नवी दिल्ली – देशातील काही मोठ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचे लक्षात घेऊन राज्यांनी चाचण्या घेण्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करावा आणि आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा वाढवाव्यात अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांबरोबर केलेल्या चर्चेदरम्यान केली. आजच्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी 14 राज्ये आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरील गर्दी, सोशल डिस्टन्सिंग न ठेवले जाणे, खूप मोठ्या संख्येने झालेला नागरिकांचा दररोजचा वावर आणि लहान घरांमुळे करोना विषाणू विरोधातील लढाई अधिकाधिक आव्हानात्मक बनली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी केलेल्या चर्चेची आजची दुसरी फेरी होती.
जीव वाचवण्याला सर्वोच्च प्राथमिकता असावी, असे त्यांनी नमूद केले आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास सांगितले. देशभरातील लॉकडाऊन दरम्यान लोकांनी पाळलेल्या शिस्तीमुळे विषाणूच्या फैलावाची वाढ थांबली आहे. रूग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने, आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाबाबत भारतातील स्थिती आता पूर्वीच्या दृष्टीने आता अधिक चांगली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
करोनाच्या नियंत्रणासाठी क्षमता वाढीची माहिती जाणून घेताना पंतप्रधानांनी आरोग्य सुविधा, माहिती यंत्रणा, मानसिक आधार आणि सार्वजनिक सहभागावर भर देण्याची सूचना राज्यांना केली. करोनाच्या साथीदरम्यान संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संख्येच्या संदर्भाने करोना रुग्णांच्या चाचण्या, पाठपुरावा, शोध आणि विलगीकरणाच्या गरजेलाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दिल्लीसह काही राज्ये आणि शहरांमध्ये पुरेशा प्रमाणात चाचण्या केल्या जात नाहीत, अशी टीका केली जात आहे. म्हणून पंतप्रधानांनी ही सूचना केली.
करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही वाढते आहे. फारच कमी रुग्णांना अतिदक्षता आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते आहे, ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे. देशात सध्या करोनाच्या चाचण्यांसाठी 900 पेक्षा अधिक प्रयोगशाळा, लाखो विशेष खाटा, हजारो विलगीकरण केंद्रे, टेस्टिंग किटचा पुरेसा साठा, एक कोटीपेक्षा अधिक पीपीई आणि तितक्याच संख्येने एन-95 मास्क राज्यांना पुरवले गेले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
काही राज्यांमध्ये जरी करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी नागरिकांचा संयम, प्रशासनाचे काम आणि करोना योद्ध्यांच्या योगदानामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही, असेही ते म्हणाले.
वेळीच माहिती देण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी विशेष जोर दिला. “हेल्पलाईन’ या निरुपयोगी न ठरता, उपयोगी ठराव्यात याची काळजी घेतली जावी. रुग्णांना टेलिमेडिसीनद्वारे मार्गदर्शन देण्यासाठी तज्ञ डॉक्टर आणि आवश्यक सूचना देण्यासाठी कार्यकर्त्यांची टीम बांधणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जर कोणाला संसर्ग झाला असला तरी बरे झालेल्यांची संख्याही खूप मोठी आहे, म्हणून नागरिकांनी घाबरून जाता कामा नये. स्वच्छता, मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याची नागरिकांना वारंवार आठवण करून देण्यावर भर देताना राज्यांनी आपल्या चांगल्या कृतीची माहिती अन्य राज्यांना द्यावी, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
आज झालेल्या बैठकीला महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारचे मुख्यमंत्री होते. देशातील रुग्णांपैकी अधिकांश रुग्ण यापैकी काही राज्यांमध्येच आहेत.