श्रीनगर – काश्मीर मधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोब झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. ही चकमक पहाटेपासून सुरू होती. सुगी भागात लपलेल्या अतिरेक्यांच्या विरोधातील नाकाबंदी करून शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. या कारवाईच्यावेळी ही चकमक झाली. दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी चकमकीच्या सुरुवातीलाच मारले गेले. त्यानंतर दीर्घकाळापर्यंत सुरू राहिलेल्या चकमकीत आणखी तीन दहशतवादी मारले गेले.
या जिल्ह्यात झालेली या आठवड्यातील ही तिसरी चकमक आहे. या आधीच्या दोन चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचे नऊ दहशतवादी ठार झाले आहेत. त्यामुळे चार दिवसात वेगवेगळ्या चकमकींमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आता 14 झाली आहे.
आज ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. पण तेही बहुधा याच संघटनेचे असावेत असा कयास आहे. शोपियॉं जिल्ह्यातील या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. या जिल्ह्याच दहशतवाद्यांना मोठा आश्रय मिळत असल्याने सुरक्षा यंत्रणांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आपले लक्ष केंद्रीत केले असून त्यात त्यांना मोठे यश येऊ लागले आहे.