पुणे -समाजामधील वंचित घटकांना मदत करताना राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी कार्य करत असतो. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी मोलाचे योगदान देत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही फक्त कार्यप्रणाली नसून ती एक जीवनशैली आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सेवा योजना संचालनालयाचे सहाय्यक कार्यक्रम उपदेशक डॉ.कमल कुमार कर यांनी केले.
महाराष्ट्र व गोवा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रादेशिक संचालनालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाबुरावजी घोलप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट ऑफ एनएसएस ऍक्टिव्हिटीज इन पोस्ट पॅंडेमिक वर्ल्ड’ या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारच्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र व गोवा चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डी. कार्तिगन, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रशासन विभागाचे सहसचिव ए. एम.जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, युथ ऑफिसर अजय शिंदे आदी उपस्थित होते. ए. एम.जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेच्या व उद्देशाच्या बाबतीत माहिती दिली. चेन्नईचे संचालक डॉ. सॅम्युअल चेल्लाई व भुवनेश्वरचे संचालक डॉ. एन. बी. खुंटिया हे तज्ज्ञ उपस्थित होते.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्याला घालून दिलेल्या सामाजिक शिष्टाचाराचे जसे की सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे आदींचे पालन करणे गरजेचे आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले आहे. वेबिनारच्या समारोप प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.