पुणे – नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापली असून, वारे गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहेत. मात्र, या वाऱ्यांना पुढे सरकरण्यास अनुकूल वातावरण नसल्यामुळे मान्सूनची वाटचाल “जैसे थे’ आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुढील 24 तासांत राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे शहरासह जिल्ह्यात आकाश ढगाळ राहिल आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. बदलत्या हवामानामुळे विदर्भासह मध्य महाराष्ट्रात कमाल तापनात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. महाबळेश्वर येथे सर्वात कमी 16.8 तर सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे 39 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
दरम्यान, यंदा मान्सून चार दिवस उशिराने केरळात येण्याची शक्यता असताना, अरबी समुद्रात असलेल्या “निसर्ग’ चक्रीवादळामुळे मान्सून नियमित वेळवर 1 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. तेथून मान्सूनने केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईम्बतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला होता. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताना पश्चिम किनारपट्टीलगत मान्सूनने वाटचाल केली आहे.