कराड -कराड तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या आणखी दोन गावात करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे अहवाल आले आहे. यामध्ये उंडाळे विभागातील तुळसण व उंब्रज विभागातील पाली गावातील बाधितांचा समावेश आहे. दोन्ही विभागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून गावे प्रशासनाकडून सील करण्यात आली आहेत.
कराड दक्षिणमधील म्हारूगडेवाडी, म्हासोली गावानंतर आता तुळसण गावात करोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा अहवाल मिळाला. मुंबई रिटर्न असणाऱ्या एका 62 वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे. मात्र, ही व्यक्ती दोन महिन्यापूर्वी गावात आली आहे. गेल्या दोन महिन्यात गावात अनेक ठिकाणी ते फिरले आहेत. तसेच गत चार दिवसापूर्वी त्याच्या एका मुलाचा वाढदिवसाचा कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गावातील अनेक युवक हजर होते. त्यामुळे या सर्वांची माहिती काढण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच संबंधित व्यक्ती गावातील अनेक लोकांना भेटली असल्याचेही सांगण्यात येत आहे. या सर्वांचा शोध घेण्याचे काम बुधवारी सुरू होते. दरम्यान, संबंधिताच्या संपर्कातील सात जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
या घटनेने उंडाळे विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यापूर्वी विभागातील दोन गावांना करोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यातून नि:श्वास टाकत असतानाच भागातील आणखी एका गावात करोनाबाधित रूग्ण सापडल्याने प्रशासनासमोर नवे संकट उभे राहिले आहे. दरम्यान उंब्रज विभागातील अतिशय धार्मिक व राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या पाली गावातही एक करोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. संबंधित व्यक्ती मुंबईहून आलेली आहे.
पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावाची पाहणी करून गावाच्या सीमा सील केल्या आहेत. तसेच संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सात जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दोन्ही गावातील लोकांचा सर्व्हे करण्यासाठी प्रत्येकी बारा पथक तयार करण्यात आलेली आहेत. गावात मुंबईहून आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्यावर प्रशासनाची आता करडी नजर असणार आहे. तसेच गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनलद्वारे तपासणी केली जाणार आहे. दोन्ही गावांची तालुक्यातील वनवासमाची व म्हासोलीसारखी स्थिती होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे कराड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले.