निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक
वेल्हे (प्रतिनिधी)– अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तहसील कार्यालय वेल्हे येथे मंगळवारी (दि.२) तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नागरिकांना या चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोकण विभागात अरबी समुद्र किनाऱ्यावर २ जून ते ४ जून या कालावधीत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असून वेधशाळेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वादळाचा परिणाम वेल्हे तालुक्याला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व विभागांनी सतर्क राहून आपल्या विभागाशी सर्व त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना तहसीलदार शिवाजी शिंदे यांंनी दिल्या आहेत.
सदरील चक्रीवादळाचा वेग ताशी १०० ते ११० किमी असणार आहे. त्यामुळे वेधशाळेने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून गाव पातळीवरील सर्व यंत्रणा सज्ज ठेवून कच्ची घरे, पत्र्याची घरे, पत्र्याचे शेड येथे राहणाऱ्या लोकांची पक्क्या घरामध्ये, मंदिरामध्ये, पक्क्या शालेय इमारती, पक्क्या अंगणवाडी इमारतीमध्ये सोय करण्यात यावी. ज्या ठिकाणी असे नुकसान होऊ शकते त्या ठिकाणची माहिती घेऊन या वादळापासून संरक्षण करण्यासाठी व जीवितहानी टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.
त्याचबरोबर नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरणे, कमकुवत झाडांचा व इमारतीचा आसरा घेणे टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच जनावरांची योग्य त्या ठिकाणी सोय करण्याची दक्षता घ्यावी. अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे यांच्या काठी राहणाऱ्या लोकांची सोय सुरक्षित ठिकाणी करण्यात यावी. यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावात दवंडी देण्यात यावी व सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, महावितरणचे संदीप सोनार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्या अश्विनी घोडके, कनिष्ठ अभियंता निखील करंजकर, गटशिक्षणाधिकारी सुनील मुगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आय. जी. मुलाणी, शाखा अभियंता. पी.जी. गाडे, संजय मंडगे उपस्थित होते.
अशी घ्या काळजी ….
बुधवारी दुपारपर्यंत वादळाचा जोर जास्त असेल त्यानंतर लवकरच ओसरेल तरी उद्या आणि परवा दुपारपर्यंत आवश्यक ती बाहेरची कामे आणि विजे संबंधित कामे उरकून घ्यावीत नंतर एकदा लाईट गेली की कधी येईल ते सांगणे कठीण आहे.
१. भाजीपाला आणून ठेवा.
२. फोन चार्ज करा आणि कमीत कमी वापरा.
३. उडून खराब होणाऱ्या किंवा नुकसान पोहचवणाऱ्या वस्तू सांभाळून ठेवा.
४. कोणत्याही झाडाखाली थांबू नका शक्यतो नारळाच्या झाडाखाली थांबू नका.
५. विजा चमकत असतील तेव्हा विजेची शक्य तेवढी सगळी (टीव्ही, फ्रिज, कंप्युटर, गीजर, एसी, फिल्टर) उपकरणे प्लग मधून काढून ठेवा तसेच सेट टॉप बॉक्सला जोडणारी बाहेरून आलेली डिशची वायर देखील काढून ठेवा.
६. वादळाच्या काळात इन्व्हर्टरचा वापर कमीत कमी करून वीज वाचवा.
७. बाहेर असाल तर फ्लेक्स, जाहिरातींचे तसेच दुकानाच्या नावाचे बोर्ड, झाडाच्या फांद्या यापासून सावध रहा.
८. वादळ शांत झाल्यावर देखील लगेच बाहेर पडू नका, साठलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह चालू असू शकतो.