सर्वसामान्य कष्टकरी कामगारांना आयुष्य समर्पित करणारे डॉ. बाबा आढाव यांचा आज जन्मदिवस. आज वयाच्या नव्वदीतही बाबांचा दिवस उजाडतो आणि मावळतो कोणत्यातरी चळवळ, आंदोलन, उपोषण, सत्याग्रहाने. असे हे सत्यशोधक-संघर्षयात्री!
डॉ. बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला. प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. बीएस्सीची पदवी मिळाल्यानंतर मिश्र वैद्यकशास्त्राची डीएएसएफ पदविका प्राप्त केली. प्रारंभी काही वर्षे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. “महाराष्ट्र आरोग्य मंडळ’ या संस्थेची स्थापना करून व्यक्तिगत वैद्यकीय व्यवसायाचे “सामाजीकरण’ केले. त्याचेच रूपांतर साने गुरुजी रुग्णालयात झाले. त्यांनी 1966 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. व्यक्तिगत रुग्णोपचाराऐवजी समाजाला जडलेल्या विविध व्याधींवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णत्वाने समर्पित केले.
बाबांची वैचारिक जडणघडण राष्ट्र सेवा दलात झाली. आपल्या आयुष्यातील पहिला सत्याग्रह 1952 साली अन्नधान्य भाववाढ विरोधात केला. त्यानंतर “तुरुंगाशी नाते’ कायमचे जडले. गोवा मुक्ती आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ते अग्रभागी होते. पुण्यात झोपडपट्टीवासियांसाठी “झोपडी संघ’ स्थापला. आणीबाणीमध्ये मोठा मेळावा घेतला. परिणामतः मिसा खाली त्यांना 16 महिन्यांचा कारावास झाला. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन परिषदेची स्थापना त्यांनी केली.
प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा कायदेशीर हक्क मिळाला. “हमाल पंचायत’ हा बाबांच्या चळवळी-कार्यांचा केंद्रबिंदू. हमाल माथाडी कायदा अस्तित्वात आला. हमालांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, बोनस मिळू लागला. पुण्यात “हमाल भवन’ उभारले. हमाल पंचायत, कष्टाची भाकरी यामुळे सकस अन्न कष्टकऱ्यांना मिळू लागले. “हमाल नगर’ ही पाचशे सदनिकांची वसाहत साकारली. कष्टकरी विद्यालयातून प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण देऊन कष्टकऱ्यांच्या नव्या पिढीला उज्ज्वल भविष्याची ग्वाही दिली.
सन 1955 ते 1972 या कालखंडात प्रजासमाजवादी संयुक्त समाजवादीपक्षातर्फे एसेम जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य यांच्या समवेत विविध चळवळी, आंदोलने, संघर्ष केले. दोन वेळा नगरसेवक झाले. मात्र, त्यानंतर राजकारणाचा सन्यास घेतला. महात्मा फुले समता प्रतिष्ठानची 1971 साली स्थापना केली. तत्कालीन दुष्काळाची पार्श्वभूमी “एक गाव, एक पाणवठा’ या ग्रंथात कथन केले. “एक गाव, एक पाणवठा’, “सत्यशोधनाची वाटचाल’ आणि “सुबराण’ हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ.
बाबांनी सन 1974 सालापासून देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसनासाठी विविध आंदोलने केली. महाराष्ट्र सरकारने देवदासी पुनर्वसन आयोग नेमला. कायद्यात दुरुस्ती केली. वृद्ध देवदासींना पेन्शन योजना सुरू केली. पुण्याच्या राष्ट्रीय एकात्मता समितीचे बाबा संस्थापक आहेत. मुस्लीम प्रबोधनाच्या चळवळीत बाबांनी कृतिशील साथ दिली. पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद झाली. भिवंडी दंगलीनंतर बाबांनी दीड लाख रुपयांचा निधी दंगलग्रस्तांना मिळवून दिला.
गुजरातमधील दंगलग्रस्त, ओरिसातील वादळग्रस्त, मराठवाड्यातील भूकंपग्रस्त इत्यादी आपत्तीग्रस्तांना भरीव वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी बाबांनी जीवाचे रान केले. महाराष्ट्रातील विविध परिवर्तनवादी संस्था, संघटनांना “विषमता निर्मूलन समिती’च्या व्यासपीठावर एकत्र आणून बाबांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती दिली. महाराष्ट्रात संसदबाह्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या ध्येयवादी कार्यकर्त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी “सामाजिक कृतज्ञता निधी’ची उभारणी केली. लोकस्वतंत्रता समिती (पीयूसीएल)चे बाबा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
बाबांनी पुण्यातील पन्नास हजार रिक्षा चालकांना संघटित करून “रिक्षा पंचायत’ स्थापन केली. कागद-काच-पत्रा, बांधकाम, पथारीवाले, अंगमेहनती कष्टकरी, मोलकरीण इत्यादी कष्टकऱ्यांसाठी बाबा सातत्याने संघर्ष करतात. असंघटित कष्टकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा करावा यासाठी बाबांनी विविध प्रांतांमध्ये व राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या परिषदा, सत्याग्रह, आंदोलने केली. संसदेच्या सामाजिक सुरक्षा विधेयक मंजूर केले आहे. 37 कोटी कष्टकऱ्यांना या कायद्याचा लाभ मिळणार आहे. बाबांच्या आवेदन आंदोलनाची यशस्वी फलश्रृती होईल, असा विश्वास वाटतो.
आज बाबा 90 वर्षांचे आहेत. आयुष्यभर ध्येयवादी, त्यागीवृत्तीने केलेल्या कार्याला लोकमान्यता, राजमान्यता मिळाली आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये पुण्यभूषण पुरस्कारापासून महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, कवी कुसुमाग्रज, प्रा. राम शेवाळकर इत्यादी थोर व्यक्तींच्या नावे असलेल्या विविध संस्थांच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह उद्योगपती धिरूभाई अंबानी, मारवाडी फाउंडेशनचे पुरस्कार, “दि विक’ या राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी साप्ताहिकाचा “मॅन ऑफ दि इयर 2007′ हा पुरस्कार मिळाला.
2011चा उत्कृष्ट समाज कार्यकर्त्याचा राष्ट्रीय पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते बाबांना प्रदान केला. बाबांच्या ग्रंथांना केसरी मराठा संस्था, मॅजेस्टिक प्रकाशन, बॉम्बे बुक डेपो आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ इत्यादींचे पुरस्कार मिळाले आहेत.
बाबांचे कौटुंबिक जीवन अत्यंत आनंदाचे आहे. बाबांच्या पत्नी शीलाताई या महानगर पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. असीम व अंबर ही दोन्ही मुले अभियंता आहेत.
– ऍड. दत्ता काळेबेरे