नगर (प्रतिनिधी) -महामारीमुळे देशातील उद्योगधंदे व कारकाने बंद पडले आहेत. लॉकडाऊनचा फार मोठा तडाखा बारा बलुतेदार व अलुतेदार घटकांतील लहान-लहान व्यवसायिकांना बसला आहे. रेडिमेड गारमेंटस्मुळे अगोदरच टेलरिंग व्यवसायावर अवकाळा आली आहे. त्यामुळे शासनानी शिपी समाजाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष शैलेश धोकट यांनी केली आहे.
लगीनसराईच्या काळात वर्षभराची तजवीज करुन ठेवणाऱ्या शिंपी समाजबांधव व्यावसायिक व कारागीरांवर मोठे संकट कोसळले आहे. नुकतेच केंद्र सरकारने याबाबत उपाययोजना म्हणून 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये एमएसएमई सेक्टरसाठी 3 लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले.
पारंपारिक चरितार्थाचे शिवणकाम हे एकमेव साधन असलेल्या शिंपी समाजातील बांधवांवर उपासमारीची वेळ येत आहे. साधारण खेडेगावातील शिंपीसमाज बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. या समाजाला मदत व्हावी व आर्थिक संकटातून ते बाहेर पडावे, यासाठी नामदेव समाजोन्नत्ती परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष व भिंगार नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष शैलेश धोकटे व पदाधिकारी यांच्यावतीने निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.