नवी दिल्ली: गेल्या फेब्रुवारी महिन्यात सीएए कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनाच्या संबंधात पोलिसांनी आज जेएनयुच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली. दिल्लीच्या जाफराबाद येथे झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर त्या आंदोलनाला विरोध म्हणून माजी आमदार कपिल मिश्रा यांनी त्या परिसरात निदर्शने केली आणि त्यातून दिल्लीत दंगली झाल्या.
त्यात किमान पन्नास लोकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या दोघी विद्यार्थीनी असून त्यांची नावे देवांगना कलिटा आणि नताशा नरवाल अशी आहेत. या दोघी विद्यार्थीनींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत. सीएए विरोधातील आंदोलनाच्या संबंधात पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांसह आंदोलकांना अटक केली आहे.