मुंबई: वंदे भारत अभियान अंतर्गत मुंबई विमानतळावर 17 विमानांतून 2 हजार 423 भारतीय नागरिक काल (22 मे) पर्यंत विदेशातून परतले आहेत. यापैकी 906 प्रवासी हे मुंबईतील रहिवासी आहेत तर उर्वरित महाराष्ट्रातील 1 हजार 139 आणि इतर राज्यातील 378 प्रवासी आहेत. दिनांक 7 जूनपर्यंत आणखी 13 विमानांनी विदेशातील भारतीय नागरिक परतणार आहेत.
दरम्यान, परतलेल्या नागरिकांपैकी मुंबईतील विविध 43 हॉटेल्स्मध्ये मिळून सुमारे 1 हजार 128 नागरिकांना अलगीकरण व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वंदे भारत अभियान अंतर्गत भारतात परत आणण्यात येत आहे. मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासनाने सर्व कार्यवाही आखली आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, बेस्ट प्रशासन आणि मुंबई विमानतळ या सर्व यंत्रणा समन्वयाने कामकाज करत आहेत.
विशेष विमानांनी परत येणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जात आहे. प्रामुख्याने इतर जिल्ह्यातील व इतर राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयात पाठविण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. इतर जिल्हे व राज्यातील नागरिकांना त्यांचे संबंधित जिल्ह्यात विलगीकरण केले जाणार आहे.
बृहन्मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन) ची सुविधा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने 88 हॉटेलमध्ये मिळून 3343 कक्ष आरक्षित केले आहेत.
यापुढे दि. 7 जूनपर्यंत जकार्ता, जोहान्सबर्ग, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी आदी विदेशातील ठिकाणांहून मुंबईत भारतीय नागरिक परतणार आहेत.