नवी दिल्ली – करोनामुळे गेल्या दोन महिन्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यार्नी मंजूर झालेल्या अर्थसंकल्पातील प्रत्येक तरतुदीचा फेरआढावा घ्यावा लागणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
भाजपा प्रवक्त्या नलिनी कोहली याच्याशी बोलतांना सीतारामन म्हणाल्या की, दोन महिन्यापूर्वी केलेल्या तरतुदीचा आढावा घेतला नाही तर त्या तरतुदी उपयोगी ठरणार नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून राज्याबरोबरच केंद्र सरकारचा महसूल कमी झाला असला तरी केंद्र सरकारने राज्याचा करातील वाटा दिला आहे.
विकास दराचे मूल्यांकन सध्याच्या परिस्थितीत अयोग्य
रिझर्व्ह बॅंकेसह अनेक विश्लेषक संस्थानी या वर्षी भारताचा विकास दर शून्य टक्क्याच्या खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र आता आर्थिक वर्षातील फक्त दोन महिने झाले आहेत. त्यामुळे सध्यच्या परिस्थितीत पूर्ण वर्षाच्या विकास दराचे मूल्यांकन करणे बरोबर होणार नसल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, सध्या एकूण परिस्थितीचा अंदाज येणे कठीण जाणार आहे.
सीबीआयची भिती बाळगू नका
पात्र उद्योगाना कर्ज देतांना सीबीआय, सीव्हीसी, कॅगची भिती बाळगण्याची गरज नाही. त्या कर्जाना सरकारची 100 टक्के हमी आहे. त्यामुळे या पात्र उद्योगांना कर्ज द्या असे आपण बॅंकर्सना सांगितले आहे. त्याचबरोबर मी पॅकेजमध्ये सर्व क्षेत्राचा उल्लेख केला नसला तरी कोणत्याही क्षेत्रातील लघु उद्योजकांना या कर्जाचा लाभ होऊ शकणार असल्याचे सितारामन यांनी सूचीत केले.