नगर -दरवर्षी पावसाळ्यात नगरमधील उपनरगरी भागात मोठ्या समस्या निर्माण होतात. त्यात प्रामुख्याने नाले व गटर तुंबल्याने होणारी हानी मोठी असते. त्यामुळे या वर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शहर व उपनगरातील नाल्यांची तातडीने सफाई करा, अशी तंबी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिका प्रशासनाला दिली.
महापालिकेच्या वतीने शहर व उपनगरातील मोठे ओढे व नाले साफ सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कामाला अपेक्षित गती नाही. दरवर्षी हे काम सुरु होते. तथापि, पावसाळा सुरु होईपर्यंत काम उरकत नाही. परिणामी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या भागातील घरांमध्ये गटारीचे घाण पाणी शिरते, असा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे या वर्षी ही कामे अत्यंत गतीने पूर्ण व्हावीत, अशी भूमिका वाकळे यांनी स्पष्ट केली.
महापौर वाकळे यांनी आज सर्जेपूरा, लालटाकी, गुलमोहर या भागात सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. माजी नगरसेवक तायगा शिंदे, पुष्कर कुलकर्णी, शिवा आढाव आदी यावेळी उपस्थित होते. शहर अभियंता सुरेश इथापे यांनाही वाकळे यांनी सूचना केल्या. नाले सफाईतून निघालेला गाळ पुन्हा नाल्यात जाणार नाही, याची दक्षता घेण्याची महत्वाची सूचना त्यांनी केली.