नवी दिल्ली- भारतात नव्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योग स्टार्ट अप् वाढत आहेत. भारतामध्ये 9,300 स्टार्टअप ची नोंद झाली आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. मात्र करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे स्टार्ट अप्ची स्थिती बिघडली आहे. यातील 30 ते 40 कंपन्यानी मर्यादित काळासाठी दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये नव्या आणि केवळ काही महिन्यापासून सुरू झालेल्या स्टार्ट अप्ची संख्या जास्त आहे. आम्ही पुर्ण केलेल्या ऑर्डरचे पेमेंट होण्यात अडथळे येत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये ही तूट भरून काढण्याची यंत्रणा आमच्याकडे नाही. त्यामुळे मर्यादित काळासाठी काम बंद ठेवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असे या स्टार्ट अप्नी म्हटले आहे.
नॅसकॉम या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या संस्थेने देशभरातील स्टार्टअप्चे सर्वेक्षण करून अभ्यास केला असता या बाबी समोर आल्या आहेत. पॅसकॉमच्या अध्यक्ष दबजानी घोष यांनी सांगितले की, सध्या 90% स्टार्ट अप्च्या महसुलावर परिणाम झाला आहे. मात्र स्टार्ट मधील तरुण धाडसी असतात. अशा परिस्थितीतही तग धरून राहण्यासाठी त्यांनी पर्यायी उपाययोजना केल्या आहेत. किंबहुना करोना व्हायरस सारख्या परिस्थितीमुळे एकूणच परिस्थिती बदलते तेव्हा स्टार्टअप सारख्या उद्योगांना आपले उद्योग सुरू करण्याची संधी निर्माण होते.
अर्थमंत्रालयाने लघुउद्योजकासाठी तीन लाख कोटी रुपये कर्ज कारणाशिवाय उपलब्ध केले आहे. याचा उपयोग स्टार्टअप् करू शकतात असे अर्थमंत्रालयाने सूचित केले आहे. याचा खरोखरच उपयोग का याच्या शक्यता काही स्टाट अप् आजमावून पहात आहेत. घोष म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत खेळत्या भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर पेपरवर्क करतानाही बरेच अडथळे येत आहेत. मोठ्या स्टार्ट अप्नी सांगितले की ही परिस्थिती 8 महिन्यात अटोक्यात येईल तर छोट्या स्टार्ट अप्ना वाटते की, या परिस्थितीचा परिणाम प्रदीर्घ काळ टिकण्याची शक्यता आहे.