मुंबई – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येतायेत. रुग्णसंख्येतील ही वाढ आरोग्यव्यवस्थेचा कणा मोडणारी ठरत असून ठिकठिकाणी हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन, रेमडीसीवीर सारख्या औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. उपचारांअभावी मृत्युदर देखील चांगलाच वाढल्याने आता स्मशानभूमीबाहेर देखील रांगा लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळतंय. करोना रुग्णसंख्येच्याबाबतीत पहिल्या लाटेप्रमाणे यावेळी देखील महाराष्ट्रात बाधितांची सर्वाधिक संख्या आहे.
करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध म्हणत एकप्रकारे लॉकडाऊन लावला आहे. हा लॉकडाऊन १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लागू करण्यात आला होता. मात्र, राज्यातील बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता हा लॉकडाऊन आता वाढविण्यात आल्याची माहिती आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला असल्याचे स्पष्ट सांगितलंय.
याबाबत बोलताना टोपे यांनी, हा लॉकडाऊन किती दिवसांसाठी वाढविण्यात येईल, याचा तपशील लवकरच जाहीर होईल. पण, तो 15 दिवसांसाठी वाढविण्यात यावा, असं माझं वैयक्तिक मत आहे, असेही स्पष्ट केले. त्यामुळे, राज्यात 15 मे पर्यंत पुन्हा कडक निर्बंध लागू असतील, असेच दिसून येते.