नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. आरोग्य यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात ताण आला होता. आता दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये नियम शिथील करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांकडून पुन्हा पूर्वीसारखीच गर्दी करण्यात येत आहे. यावरून केंद्र सरकारने राज्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
ज्या भागात करोनाबाबतच्या नियमांचं उल्लंघन होईल, त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन सुरू करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिला आहे. देशभरात अनेक ठिकाणी करोना नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. तसेच लोक पावसाळा असल्याने पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. त्यामुळे गर्दी वाढत असून करोना संसर्ग पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे.
अनेक राज्यांमध्ये बाजारपेठा, दुकानं आणि मॉल्समध्ये ग्राहकांची झुंबड उडत आहे. यामध्ये नियम पाळले जात नाही. या गोष्टी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
दरम्यान राज्यांना सर्व व्यवहार पूर्ववत करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, हे करताना करोना नियम मोडले जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच करोना नियमांचं पालन करण्यात आलं नाही, तर त्या भागात कडक लॉकडाऊन करण्यात येईल, असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.