वाई (प्रतिनिधी) – वाई शहरात दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणी वाई शहर व तालुक्यातील संशयास्पद व्हॉटस्ऍप ग्रुपचे अडमिन आणि सदस्यांना पोलीस ठाण्यात बोलावून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. चौकशीच्या भीतीमुळे अनेकांनी आपले मोबाइल बंद केले आहेत.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी गेल्या दोन दिवसांत दोनशे ते तीनशे “भाईं’ची वाई पोलीस ठाण्यात सकाळ-सायंकाळ हजेरी सुरू असल्याने आजूबाजूच्या परिसरात गर्दी दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही वाई पोलीस ठाण्याला जत्रेचे स्वरूप येत आहे. जिल्हा प्रशासनाचा जमावबंदीचा आदेश व वाई शहरातील नाक्यानाक्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही रविवार पेठेत रात्री भर रस्त्यात झालेल्या गोळीबारामुळे पोलिसांसह वाईकर चक्रावून गेले आहेत.
या गोळीबाराचे खर कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरी वाई पोलीस कसून तपास करत आहेत. वाई शहर व तालुक्यातील काही संवेदनशील गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मारामाऱ्या, दहशत, खंडणी, घातक शस्त्रांची विक्री, अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व पोलीस रेकार्डवरील अनेकांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. शहरातील रविवार पेठ, सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी, लाखानगर, सोनजाईनगर, गंगापुरी, तालुक्यातील बावधन, पसरणी, भुईंज, पाचवड येथील अनेकांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा वाई पोलिसांनी बजावल्या आहेत.
पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, उपनिरीक्षक राजेंद्र कदम, संजय मोतेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कृष्णा पवार, विजय शिर्के, प्रशांत शिंदे, बापूराव मदने, श्रीनिवास बिराजदार, सोमनाथ बल्लाळ हे तपास कामात आघाडीवर आहेत. भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि शाम बुवा व कर्मचाऱ्यांवर भुईंज, पाचवड परिसराची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाचगणीचे सपोनि सतीश पवार हेदेखील वाई पोलिसांना तपासकामात मदत करत आहेत.