जळगाव: देशात करोनाचा कहर वाढतच असताना लॉकडाउनही वाढत असल्याने स्थलांतरित मजुरांसमोरील प्रश्नही गंभीर रूप धारण् करत आहे. या लॉकडाऊन काळातील भयाण वास्तव आता समोर येत आहे.
मुंबईहून उत्तर प्रदेशाकडे चालत निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. तर एका मजुराने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना जळगावातील मुक्ताईनगरजवळ घडली. उपाशीपोटी चालून थकलेल्या या मजुरांचा धीर सुटला आणि त्यांचा भुकेने बळी घेतला.
नुकतंच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उपासमारीने किंवा भुकेने कोणत्याही मजुराचा मृत्यू होणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र गोयल यांच्या आश्वासनाच्या काही तासातच जळगावात ही धक्कादायक घटना घडली.
मुंबईवरून उत्तर प्रदेशच्या दिशेने असंख्य मजूर वाट काढत आहेत. मिळेल त्या वाहनाने प्रसंगी चालत हे मजूर गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगावपर्यंत उपाशीपोटी चालत गेलेले हे मजूर इतके थकले की त्यांचा मृत्यू झाला. तर एका मजुराने थेट पूर्ण नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. या मजुराने उपासमारीला कंटाळून पुलावरुन उडी मारून नदीच्या पात्रात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
हे मजूर अनेक दिवसांपासून पायी घरी परतत आहेत. वाटेत मिळेल ते खायचं, काही मिळाले नाही तरी तसेच चालायचे. असं करत करत हे मजूर जळगावपर्यंत पोहोचले होते. मात्र त्यांची वाट भुकेने रोखली आणि तिथेच ते हरले.