मुंबई: करोना व्हायरसच्या संकटकाळात पुन्हा एकदा प्रादेशिक वाद उफाळून आला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांचे (IFSC) मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी गुजरातकडे बोट दाखवत मुंबईचे लचके तोडण्यासाठी काही जण टपून बसले असल्याचा घणाघात केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे, हे दिसून येतंय आणि मुंबईचा लचका तोडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे, अशा आशयाची फेसबुक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
आव्हाड यांच्या या आक्रमक टीकेनंतर आता राजकीय क्षेत्रात काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावं लागेल.
जितेंद्र आव्हाड यांनी करोना व्हायरसवर यशस्वी मात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता ठणठणीत असून ते सध्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.