एक अनुभवी कलाकार आणि प्रतिभाशाली दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राजेश पुरी हे अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्त्व व नम्रपिता म्हणूनही परिचित आहेत. छोट्या पडद्यावरील नामांकित कलाकारांमध्ये त्यांची गणना केली जाते. सध्या ते “संतोषी मां सुनाए व्रत कथायें’ या एंड टीव्हीवरील पौराणिक मालिकेमध्ये मानबहाद्दूर सिंह यांची भूमिका करत आहेत. तथापि, त्यांनी अलीकडेच आपली खंत व्यक्ती केली आहे. ही खंत मोठ्या पडद्यावर त्यांना मिळालेल्या भूमिकांबाबत आहे.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी)मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन मुंबईमध्ये आलेले राजेश पुरी हे दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले आहेत. “हम लोग’ या बहुलोकप्रिय मालिकेने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. याखेरीज 500 हून अधिक नाटकांमधून आणि 130 हून अधिक चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला. मात्र आपल्यातील टॅलेंटचा म्हणावा तसा वापर झाला नाही, असे ते म्हणतात.
माझ्या पात्रतेनुसार मला भूमिकाच मिळाली नाही, अशी खंत ते व्यक्त करतात. अर्थात, मोठ्या पडद्यावर साकारलेल्या कोणत्याही भूमिकेबाबत मला पश्चाताप होत नाहीये; पण मी अजूनही ताकदीच्या, सशक्त भूमिका करू शकलो असतो, तेवढे टॅलेंट माझ्यात होते; पण माझा विचारच झाला नाही याचा खेद वाटतो असे ते म्हणतात. चित्रपटात मला मिळणाऱ्या व्यक्तिरेखेचा अभिनयकाळ किंवा लांबी कितीही असो, पण तो असा असला पाहिजे की प्रेक्षकांना विलक्षण आवडून गेला पाहिजे, असे ते म्हणतात.