जेजुरी -लॉकडाऊनच्या वाढविलेल्या तिसऱ्या टप्प्यातील कालावधीत राज्य सरकारने दारू दुकाने, वाईन शॉप उघडण्यास परवानगी देताच दारू दुकाने आणि वाईन शॉपच्या दारात तळीरामांची गर्दीच उसळली आहे. दुकाने उघडण्यापूर्वीच हातात पिशव्या घेतलेल्या दारुप्रेमीच्या लांबच लांब रांगा, ग्रामीण भागातही हेच चित्र दोन दिवसांपासून दिसत आहे.
दारू, वाईन, बिअर खरेदीमुळे पोलीस प्रशासनावर पुन्हा ताण पडत आहे. सुरक्षित अंतराचा आणि संचारबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. दारू विक्री- खरेदीच्या नावाखाली गर्दी वाढत असल्यामुळे करोना बाधितांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेली दारू विक्रीची दुकाने, वाईन शॉप खुली करणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर होताच सकाळपासूनच दारूप्रेमींच्या रांगा दुकानांपुढे लागल्या होत्या. ग्रामीण भागातही असेच चित्र दिसत आहे. एक ते दीड किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या रांगा दुकानांसमोर लागल्या आहेत.
विशेषतः 21 ते 45 वयोगटातील नागरिक संचारबंदीचा नियम धाब्यावर बसवित आहेत. असे चित्र समोर आले आहे. दारू दुकानांसमोरील रांगा महामारीला कवटाळणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.