पिंपरी – शहरातील सोसायट्या सध्या पाणीटंचाईने हैराण झाल्या आहेत. लॉकडाऊन सुरू असल्याने घराबाहेर पडता येत नसताना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठीही सोसायटीधारकांना टॅंकर मागविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी दरमहा लाखो रुपये सोसायटीतील रहिवासी मोजत आहे. महापालिका आमची पाणी समस्या कधी सोडवणार, असा सवाल सोसायटीतील नागरिक विचारत आहेत.
महापालिकेकडून सध्या शहरामध्ये दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बरेच नागरिक घरीच आहेत. करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाण्याचा वापर वाढला आहे. तसेच, बऱ्याच सोसायट्यांमध्ये बसविण्यात आलेल्या बोअरवेलदेखील आटल्या आहेत. त्यामुळे ज्या सोसायट्यांना टॅंकरची गरज लागत नव्हती. त्यांना देखील फेब्रुवारी अखेरपासून पाण्यासाठी टॅंकर मागवावे लागत आहेत. त्यामुळे ज्या छोट्या सोसायट्यांना दर दिवशी 1 ते 2 टॅंकर लागत होते. त्यांना आता दररोज 3 ते 4 टॅंकर लागत आहेत. मोठ्या सोसायट्यांची पाण्याची मागणी तुलनेत खूपच मोठी आहे. त्यांना सध्या दररोज 10 ते 15 टॅंकर पाणी मागवावे लागत आहे.
वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, मोशी, चिखली आदी भागांमध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या जाणवत आहे. त्याशिवाय, शहराच्या अन्य भागातही थोड्या-बहुत फरकाने हेच चित्र पाहण्यास मिळत आहे. पाण्याच्या दहा हजार लिटरच्या एका टॅंकरला 700 ते 900 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सोसायट्यांना दरमहा 60 हजार ते 3 लाखापर्यंत पाण्यासाठी खर्च करावा लागत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह-शहर अभियंता मकरंद निकम यांच्याशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही.
बोअरवेल आटल्याने अडचणीत भर
पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने आम्हाला 86 सदनिकांसाठी दिवसाला दररोज 2 ते 3 टॅंकर पाणी मागवावे लागत आहे. पूर्वी आम्हाला टॅंकर लागत नव्हते. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक कुटुंबात बहुतांश सदस्य घरीच आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. त्यातच सोसायट्यांतील बोअरवेल आटल्या असल्याने जास्तच अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती वाकडमधील मॉन्टव्हर्ट व्हिवान सोसायटीचे अध्यक्ष संजय देशपांडे यांनी दिली. महापालिकेकडून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. आमची सोसायटी 25 सदनिकांची असली तरीही आम्हाला दिवसाला एक टॅंकर पाणी मागवावे लागत आहे, अशी माहिती वाकडमधील शिव आशियाना सोसायटीचे अध्यक्ष महादेव मुळे यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे कुटुंबातील बहुतांश जण घरीच आहेत. त्यामुळे स्वच्छता व अन्य कारणांसाठी पाण्याचा वापर वाढला आहे. पर्यायाने, सध्या महापालिकेकडून पुरविण्यात येणारे पाणी सोसायट्यांना अपुरे पडत आहे. महापालिका प्रशासनाने सोसायट्यांना जाणवणारा हा पाणी प्रश्न सोडविण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करणे गरजेचे आहे.
– तेजस्विनी डोमसे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.
शहरातील सोसायट्यांमध्ये पूर्वीपेक्षा 1/3 पाण्याचे टॅंकर वाढले आहेत. त्यामुळे सोसायट्यांचा पाण्यावर दरमहा होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मे महिना संपल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का? लॉकडाऊनमध्ये सोसायट्या महापालिका व पोलिसांच्या नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत. तर मग महापालिकेनेदेखील सोसायट्यांना पुरेसे पाणी देणे गरजेचे आहे.
– सुदेश राजे, माजी अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.