आयओएच्या नरेंद्र बात्रांना विश्वास
नवी दिल्ली – जागतिक पातळीवरील सर्वात मानाची समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हावी हे स्वप्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक देशवासियांच्या मनात आहे. आता हे स्वप्न पूर्ण होण्याचा आशावाद भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष (आयओए) नरेंद्र बात्रा यांनी व्यक्त केला आहे. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जगभरात करोनाचा धोका अद्याप कायम असला तरी 2032 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारत दावा करेल. 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाचा अनुभवही पाठिशी आहे. त्यामुळे आता जागतिक क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाची ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या देशात व्हावी हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न निश्चितच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यापूर्वी 2026 साली युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचीही दावेदारी करण्यात येणार आहे. या
स्पर्धेद्वारे देखील मोठ्या स्पर्धेच्या आयोजनाचा अनुभव मिळेल. अर्थात त्यासाठी यजमानपदाच्या शर्यतीत दावेदारी करताना रशिया, थायलंड यांसारख्या बलाढ्य देशांशी स्पर्धा करावी लागणार आहे. भारतात ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी उत्सुक असल्याचे पत्र भारतीय संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठविले असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येईल, असा विश्वासही बात्रा यांनी व्यक्त केला.
2010 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुविधांची निर्मिती करण्यात संथपणा आला. त्यावेळी गैरव्यवहारांचे प्रकरण देखील घडले. तसेच नुकतेच वेळेवर शुल्क भरले नसल्याने भारताला जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेचे यजमापद देखील गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत ऑलिम्पिकसारखी इतकी मोठी स्पर्धा भारतात होऊ शकेल का असाही प्रश्न सध्या विचारला जात आहे.
टोकियो ऑलिम्पिक होणारच
करोनाच्या धोक्यामुळे यंदा होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्घा एक वर्षाने पुढे ढकलण्यात आली आहे. आता त्यावेळी देखील स्पर्धा होणार का असा संभ्रम निर्माण झाला असला तरीही ही स्पर्धा आता ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणारच असा विश्वासही बात्रा यांनी व्यक्त केला आहे.