शिरूरच्या पश्चिम भागातील शेतकरी संतापले
पूर्व आणि पश्चिम भागात चासकमानच्या पाण्यावरून संघर्ष
केंदूर – चासकमान धरणाच्या पाण्याने शिरूर तालुक्याला वैभव मिळाले मात्र त्यासाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी द्याव्या लागल्या. प्रत्येक वर्षीच चासकमानच्या पाण्याचे नियोजन करण्यात यंत्रणा फेल ठरत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. जमिनी आमच्या गेल्या मात्र आमचा घसा कोरडाच का ? असा संतप्त सवाल पश्चिम भागातील शेतकरी करू लागले आहेत.
खरीप हंगामातील आवर्तन १८ मार्च ला तालुक्यात दाखल झाले. पहिल्याच टप्प्यात तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मात्र अवघे सहा दिवस या भागात पाणी फिरले मात्र उन्हाचा तडाखा जास्त असल्याने शेतकऱ्यांची पाहिजे त्या प्रमाणात तहान भागली नाही त्यानंतर पुढे पूर्व भागासाठी एक महिन्याहून अधिक दिवस पाणी सुरूच आहे शेतकऱ्यांना उचल पाणी घेण्यास देखील मनाई केली जाते. त्याचबरोबर विजेचा लपंडाव सुरूच आहे.
त्यामुळे पश्चिम भागातील शेतकरी आता संतापले आहेत. आमच्या जमिनी आम्ही दिल्या मात्र आमचाच घसा कोरडा का ? असा संतप्त सवाल पिंपळे जगताप, करंदी, वाजेवाडी, जातेगाव या भागातील शेतकरी करत आहेत.
…अन्यथा आंदोलन
लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने आमच्या व्यथा जाणून घ्याव्या दोन दिवसांत पश्चिम भागासाठी पाणी द्यावे अन्यथा या भागातील सर्व शेतकरी मिळून आंदोलन करू असा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
पिकांना पाणी द्यावे तरी कसे
दिवसा महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांवर खडा पहारा देत आहेत. वीज पंप सुरू करून देत नाहीत तर रात्री चासकमानचे अधिकारी कर्मचारी आम्हाला पाणी घेण्यास मज्जाव करत आहेत आम्ही पिकाला पाणी द्यायचं कसं अगोदरच लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्यात हक्काचं पाणी असून उघड्या डोळ्यांनी पिकं जळताना पहावी लागत आहे अशी भावना या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी हतबल झाला आहे.
प्रशासन लॉकडाऊनचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे, हातातोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. आम्ही लेखी पत्राद्वारे मागणी करूनही प्रशासन दखल घेत नाही त्यामुळे आम्ही आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत आहोत.
– समाधान डोके (माजी सरपंच जातेगाव खुर्द)
येत्या ५ ते १० मे पर्यंत या भागाला पाणी देण्याचे नियोजन झाले आहे त्यानुसार या भागाला पाणी मिळणार आहे. याच आवर्तनाला जोडून दुसरे आवर्तन होणार असल्याची माहिती मिळत आहे.
– महेंद्र गायकवाड (शाखा अभियंता, चासकमान)