नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कर्जबुडव्या उद्योगपतींची कर्जे माफ करण्यात आल्याच्या प्रकाराबद्दल मोदी सरकारला धारेवर धरणारा संदेश जारी केल्यानंतर त्याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच तेरा ट्विटस करून उत्तर दिले होते. कर्जे राईट ऑफ करणे म्हणजे कर्ज माफ करणे नव्हे, असा मुद्दा उपस्थित करीत त्यांनी ही कर्ज माफ करण्यात आलेली नाहीत, असेही स्पष्ट केले होते. तसेच नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या यांच्या कर्ज वसुली साठी त्यांच्या मालमत्ता जप्तीचीही प्रक्रिया सुरू असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते. त्याला
आज पुन्हा कॉंग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. बुडित कर्जे बाजुला ठेऊन बॅंकांचे रेकार्ड स्वच्छ ठेवण्याने बॅंका स्वच्छ नव्हे तर कमजोर होतात असे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. देशाला टोपी घालून विदेशात पळून गेलेल्या या बड्या धेंडांची कर्ज माफ करण्यानेच बॅंकांची स्थिती ढासळली आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
राहुल गांधी यांनी राईट ऑफ आणि वेव्ह ऑफ या दोन शब्दांमधील फरक माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडून समजून घ्यावा असाही टोमणा निर्मला सीतारामन यांनी मारला होता. त्या अनुषंगाने सुर्जेवाला यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की, मोदी सरकारने सन 2014 ते 2019-20 या काळात त्यांच्या उद्योगपती मित्रांची 6 लाख 60 हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत हे खरे आहे काय? रिझर्व्ह बॅंकेने माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना 24 एप्रिल रोजी एक निवेदन सादर केले आहे त्यात अलिकडच्या काळात मेहुल चोकसी, नीरव मोदी, विजय मल्ल्या आदिंची 68 हजार 907 कोटींची कर्जे माफ करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे खरे आहे काय असा सवालही सुर्जेवाला यांनी उपस्थित केला आहे.