अभियंत्यासह अन्य कर्मचारी क्वारंटाइन
पुणे – महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात शिपाई पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, त्याच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केले असून, अगदी जवळून संपर्कात आलेल्यांना डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात पाठवून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्रही निर्जंतुकीकरण करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
शहरभर पसरणाऱ्या करोनाविरुद्ध महापालिका आणि अन्य संस्था लढा देत आहे. परंतु आता महापालिकेतील कर्मचाऱ्यालाच करोना झाल्याने अन्य कर्मचाऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आईला करोनाची बाधा झाली आहे. तिच्याकडून त्याला करोनाचे संक्रमण झाले. दरम्यान, हा कर्मचारी कामावर होता.
कार्यालयातील फाइल ने-आण करणे, चहा-पाणी देणे असे काम तो करत होता. त्याच्या संपर्कात आलेल्या अभियंत्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने मिळेनात; कामगार संघटनेचा आरोप
जलशुद्धीकरण केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवण्यात येत नसल्याची तक्रार पुणे मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केली आहे. तसे पत्रही त्यांनी आयुक्तांना दिले आहे. करोनाशी सामना करत असताना तत्काळ सुरक्षा सुविधा पुरवठा करणे गरजेचे आहे, अशी शिंदे यांची मागणी आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात औषध फवारणी झाली नाही. आताही तेथे सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्हज त्याचप्रमाणे मास्क पुरवठा नाही, असा आरोप शिंदे यांनी केला.
कायम कर्मचारी त्याचप्रमाणे कंत्राटावर काम करणारे सुरक्षा रक्षक, चालक, बिगारी, कचरावेचक अशा सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षेची साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.
या जलशुद्धीकरण केंद्रातील बहुतांश कर्मचारी भवानी पेठेतील आहेत. त्या परिसरात वाढती रुग्णसंख्या पाहता, त्याचवेळी मनुष्यबळाचे नियोजन करून शिफ्ट बनवण्यात आले होते. या शुद्धीकरण केंद्रात कमी लोकांमध्ये काम सुरू होते. मात्र, या कर्मचाऱ्याला लागण झाल्याचे समजल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व 8-10 जणांना लगेचच क्वारन्टाइन सूचना दिल्या आहेत. ज्यांची तपासणी झाली, त्यांचा अहवाल दोन दिवसांत मिळणे अपेक्षित आहे. सर्वच जलशुद्धीकरण केंद्रांत कमी मनुष्यबळात कामांची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ दिला जाणार नाही.
– अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख