मुंबई: आज संपूर्ण महाराष्ट्र कोरोना महामारीचा सामना करीत आहे. प्रशासन देखील गंभीर असून कोरोनाला लढा देत आहे. देशात कोरोनामुळं विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद अडचणीत आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोठ्यातून आता विधानपरिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडणारे भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री पद काँग्रेसमुळे, आमदारकी राज्यपालाकडून, पक्ष वडलांचा… ह्या माणसाचं स्वतःच काहीच नाही’ अशी टीका त्यांनी केली आहे.
राणे म्हणाले, महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वतःसाठी नशीबवान आहे उद्धव ठाकरे. सगळं बसल्या बसल्या मिळालं आता आमदारकी पण बसल्या ठिकाणी राज्यपालांनी दिली. भिकमध्ये मिळालेल्या ह्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा.