सातारा – करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलद गतीने पावले उचलून आवश्यक त्या उपाययोजना केल्या. शहरी भागात नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामीण भागात ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत “होम टू होम’ सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
या सर्वेक्षणात नागरिक माहिती लपवत असल्याने करोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. करोनाचा फैलाव संसर्गाने होत असल्याने अनेक ठिकाणी माहिती लपवल्याने जिवाशी बेतत आहे. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी सर्वेक्षणादरम्यान खोटी माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करण्याचे प्रकार होत आहेत. सर्वेक्षण प्रशासनाच्या फायद्यासाठी नाही तर नागरिकांच्या संरक्षणहितासाठी असून सर्वेक्षणात माहिती लपवाल तर जिवानिशी जाल, याचे भान नागरिकांनी ठेवण्याची गरज आहे.
जिल्ह्यात करोनाचे संकट गडद होत असून सहा जण बाधित असून त्यातील एका व्यक्तीचा बळी गेला आहे.
अनेकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेली अनेक गावे सील करण्यात आली आहेत. त्यांच्या संपर्कातील अनेकजण क्वारंटाईन आहेत. करोना विषाणूचे संकट खूप भीषण असल्याचा प्रत्यय हळूहळू येऊ लागला आहे. एका व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे, माहिती लपवल्यामुळे किती जणांच्या जिवावर बेतत आहे, याचीही प्रचिती येत आहे. प्रशासन योग्य पावले उचलत असूनही चुकतयं काय, याचा विचार केला तर नागरिकांचा निष्काळजीपणा भोवतोय. दहा टक्के लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे स्थिती गंभीर होतेय. शिस्त सगळ्यांनीच अंगिकारली पाहिजे. तरच या संकटावर मात करण्यात यश मिळणार आहे. त्यासाठी सध्या तरी एकच पर्याय आहे. तो म्हणजे कोणीही घराबाहेर पडू नये.
करोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय भागवत यांच्यासह प्रशासनातील सर्व घटक जिवाचे रान करत आहेत. प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे. परदेशातून, मुंबई, पुण्यातून गावात कोणी नवीन आलेय का याचीही माहिती घेतली जात आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फतही सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. या सर्वेक्षणादरम्यान घरात किती व्यक्ती राहतात, आजारी कोण आहे का, बाहेरच्या गावाहून कोण आले आहे का, सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव होतेय का, असे प्रश्न विचारले जात आहेत.
या सर्वेक्षणात काही ठिकाणी संशयित आढळत असून त्यांच्यावर वेळीच उपचारही केले जात आहेत. काही संशयित रुग्णांची लक्षणे तपासून विलगीकरण कक्ष, घरातच क्वारंटाईन करणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचे संकट पाहता प्रशासन कोठेही कमी पडणार नाही, याची खबरदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. प्रशासन जर खबरदारी घेत असेल तर आपणही सर्वेक्षणात खरी माहिती सांगणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा माहिती लपवण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे करोनाचे संकट गडद होण्यास मदतच मिळत आहे. एका व्यक्तीने खोटी माहिती दिली तरी त्याचे काय दुष्परिणाम होतात हे काही घटनांवरुन लक्षात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:चा जीव वाचवण्याबरोबरच दुसऱ्याचा जीवही वाचवण्यासाठी सर्वेक्षणात खरी माहिती सांगणे गरजेचे आहे.
लक्षणे आढळल्यास साधा संपर्क
करोना विषाणू हा संसर्गाने होत असल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने वेळावेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. सततची सर्दी, कोरडा खोकला, ताप, घशात खवखव होणे आदी प्रकारची लक्षणे आढळल्यास संबंधितांनी नजिकच्या आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.
करोनाची लक्षणे आढळल्यास संबंधितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतात. आवश्यकता वाटल्यास संबंधितास विलगीकरण कक्षात अथवा घरातच होम क्वारंटाईन करण्यात येते. करोना संशयित अथवा बाधित रुग्णाचे नाव कोठेही जाहीर करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कसलीही भीती मनात न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास करोनावर मात करता येईल.