सातारा – कोरेगाव, खटाव, फलटण तालुक्यात शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवणूक करून द्राक्ष लागवड केली. करोना विषाणूचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन आणि ढगाळ वातावरणामुळे हातातोंडाला आलेले द्राक्ष पीक धोक्यात आले. या संधीचा फायदा घेऊन कवडीमोल दराने द्राक्ष खरेदी करून व्यापारी दुप्पट फायदा मिळवत आहेत.
करोना संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला असून त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतात उत्पादित मालावर झाला आहे. अनेक ठिकाणी परिपक्व झालेल्या द्राक्ष बागा करोना व अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानाचा विपरित परिणाम अशा दुहेरी संकटात सापडल्याने द्राक्ष उत्पादित शेतकरी हवालदिल झाला आहे.
लॉकडाऊनचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतात उत्पादित मालावर झाला आहे. सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने बाजारपेठेत शांतता आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपली तरकारीची पिके सोडून दिली आहेत. त्याचबरोबर अधूनमधून निर्माण होणारे ढगाळ हवामान व पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल होत आहे. त्याचा जास्तीत जास्त विपरित परिणाम जिल्ह्यातील द्राक्ष बागांवर होत आहे. सद्यस्थितीत द्राक्षे बागा माल तोडणीच्या अवस्थेत असल्या तरी मजुरांची वाणवा, वाहतूक व्यवस्थेचे संकट, व्यापारी वर्गाची माल खरेदीची अनास्था व प्रतिकूल वातावरण यांचा विपरीत परिणाम उत्पादकांवर झाला आहे. बागेत असलेला माल विकला जाऊन अपेक्षित आर्थिक मिळकत होणार का, याबाबत शेतकरी वर्गामध्ये साशंकता आहे.
वर्षभर प्रचंड भांडवली खर्च व काबाडकष्ट करून पिकविलेला माल करोना व पावसामुळे वाया जाणार की काय या धास्तीने शेतकरी चितांग्रस्त झाल्याचे पाहवयास मिळत आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात द्राक्ष हंगामातच लॉकडाऊन असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. वाहतूक परवाना जलद मिळाल्यास उत्पादकांचे नुकसान होणार नाही, असे मतही व्यक्त होत आहे.
वाहतूक परवाना ग्रामपंचायतीत मिळण्याची मागणी
शेतीमाल वाहतूक करण्यासाठी प्रशासनाने परवाना घेण्याचे आवाहन केले असले, तरी या परवान्यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज प्रक्रिया करावी लागत आहे. लॉकडाऊनची स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना बाहेर पडणे शक्य नसल्याने संबंधित विभागाने अशा परवान्याची सुविधा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सर्वच निविष्ठांच्या वाढत्या खर्चामुळे द्राक्ष बागांचा उत्पादन खर्च वाढत आहे. सद्यस्थितीत माल काढणीच्या अवस्थेत असून करोना व प्रतिकुल हवामान यामुळे लाखो रुपये खर्च करून वर्षभर जपणूक करूनही भांडवली खर्च निघतोय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा विचार करून संबंधित प्रशासनाने द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.
– राहुल धुमाळ (द्राक्ष उत्पादक)