सातारा – परीक्षा संपून ऐन उन्हाळ्याच्या हंगामात सातारा जिल्ह्यातील पाचगणी-महाबळेश्वरसह विविध पर्यटनस्थळे पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक असायची. मात्र यंदा अप्रिल महिना सुरु झाला तरी “करोना’च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनचा फटका जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला बसत आहे. कास तलाव, तापोळा, वासोटा-नागेश्वर किल्ला ट्रेकींग यासह सज्जनगड, गोंदावले, पुसेगाव, औंध, पालीचा खंडोबा अशा धार्मिक स्थळांना भेटी देणेही अशक्य बनले आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या या सर्व ठिकाणच्या व्यावसायिकांना “वेट अँड वॉच’शिवाय पर्याय उरलेला नाही.
महाबळेश्वर-पाचगणी येथे अतोनात पाऊस असतो. त्यामुळे मुळातच जुलै ते सप्टेंबरदरम्यान तेथील पर्यटन व्यवसाय रोडावलेला असतो. गेल्या वर्षी जगातला सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची नोंद झाली. त्यामुळे या हिल स्टेशनवरील व्यावसायिकांना उन्हाळा आणि हिवाळा या दोन हंगामातच व्यवसायाची संधी असते. अशात आता निम्मा उन्हाळा तर जात चालला; आणि पुढे मे अखेर काय होईल, हे सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, गाईडस, चणेवाले, स्थानिक चामड्याचे कारागिर आणिमध-स्ट्रॉबेरीचे उत्पादक हवालदिल झाले आहेत. पाचगणी हे शैक्षणिक केंद्र असून इथल्याही बहुतांश निवासी शाळा रिकाम्या करण्यात आल्या आहेत. “भिलार’मध्येही “पुस्तकांच्या गावात’ शुकशुकाटच आहे.
पावसाळी फुलांसाठी प्रसिद्ध असलेले कास पठार या हंगामात कोरडेठाक असले तरी, जवळच नयनरम्य कास तलावही आहे, जिथले वातावरण आल्हाददायक असते. पुढे अगदी जवळच बामणोली अर्थात कोयना अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. येथून लॉन्चने शेम्बडी येथील नारायण महाराज मठ, त्रिवेणी संगम तसेच वासोटा किल्ल्याचा पायथा असलेल्या मेट इंदवलीत जाता येते. शिवाय “महाराष्ट्राचे मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या तापोळ्यालाही येथून लॉन्चने जाऊन तेथेही कृषी पर्यटनाचा, वॉटर स्पोर्टसचा आनंद घेता येतो. मात्र, सध्या पर्यटकच नसल्याने बामणोली येथे बोटी नांगरुन ठेवलेल्या दिसून येतात.
ठोसेघरचा धबधबा नसला तरी, चाळकेवाडी-वनकुसावडेचा पवनचक्की प्रकल्प पहायला अनेक पर्यटक येतात. सज्जनगडला आलेले भाविकही आपसूक इकडे वळतात. तर उरमोडी जलाशयाभोवती असलेल्या लहान-लहान हॉटेल व्यावसायिकांनाही पर्यटकांचा मोठा आधार असतो. मात्र, सध्या तेही लॉकडाऊन संपण्याची प्रतिक्षा करत आहेत.
जिल्ह्याच्या पूर्व भागात पुसेगावचे सेवागिरी महाराज आश्रम मंदिर, गोंदावल्याचे गोंदावलेकर महाराज मंदिर, औंधचे श्री यमाई मंदिर आणि यमाई टेकडीवरील श्री भवानी वस्तु संग्रहालय या ठिकाणांनाही पर्यटक आवर्जून भेट देतात. मात्र, सध्या सर्वच मंदिरांना कुलपे असल्याने आणि संग्रहालयांनाही बंदी आदेश सक्तीचा असल्याने ही ठिकाणेही लॉक डाऊन संपण्याची वाट पहात आहेत.
लिंब येथील बारा मोटेची विहीर, वडाचे म्हसवे येथील विशाल वटवृक्ष तसेच अन्य लहानमोठ्या ठिकाणांनाही भेट देणारे पर्यटकच आता नसल्याने, महाराष्ट्रातील आघाडीचा पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेला सातारा लॉकडाऊन संपण्याची प्रतिक्षा करत आहे, हे वास्तव आहे.