मुंबई – महाराष्ट्रातील 130 मजुरांना आणि दोन कुटुंबातील तेरा जणांना त्यांच्या मूळ गावी घेऊन जाणाऱ्या पाच वाहनांच्या चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री शिवडी भागात तपासणी करीत असताना त्यांना एका ट्रक मधून 53 मजुरांना त्यांच्या उत्तरप्रदेशातील बलरामपूर गावी नेले जात असल्याचे आढळून आले.
त्या वाहनाचा चालक झियाउल्ला रेहमानी याला अटक करण्यात आली. याच भागात एका मिनी टेम्पोतून सहा जणांना राजस्थानात नेले जात होते त्यांनाही थांबवण्यात आले असून त्या टेम्पोचा चालक अकबरअली अहमद यालाही अटक करण्यात आली.
अशाच प्रकारे 76 मजुरांना घेऊन जाणारे दोन ट्रकही पकडण्यात आले. त्यांचे चालक कमल शहा आणि लालजी पंचम कनोजीया यांनाही अटक करण्यात आली. या दोन ड्रायव्हर्सनी प्रत्येक मजुराकडून तीन हजार रुपये भाडे घेतले होते असे तपासात निष्पन्न झाले आहे. लॉकडाऊनचा आदेश मोडल्याबद्दल या चालकांना अटक करण्यात आली आहे.