करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय
नवी दिल्ली – करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या 18 जागांसाठी होणारी निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार त्या निवडणुकीसाठी 26 मार्च हा दिवस निश्चित करण्यात आला होता.
देशातील 17 राज्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 55 जागांसाठी निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर केली. त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले 10 राज्यांमधील 37 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि राजस्थान या राज्यांमधून निवडून द्यावयाच्या 18 जागांसाठीच प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. मात्र, करोनाच्या फैलावामुळे आरोग्यविषयक आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
देशातील बहुतांश राज्यांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. स्थितीचा आढावा घेऊन निवडणूक आयोग पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करणार आहे. राज्यसभा निवडणूक लांबणीवर पडल्याने तूर्त राजकीय हालचाली थंडावणार आहेत. ती निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनवल्याने चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.