मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जनता संचारबंदीच्या काळात लोकांना टाळी आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य संपुष्टात आले असा आरोप शिवसेनेने केला आहे.
आपल्या पक्षाच्या मुखपत्रात दिलेल्या अग्रलेखात त्यांनी म्हटले आहे की, या रोगाविषयी भीती आणि दहशत असल्याने तो विषय लोकांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित होते आणि लोकांमध्ये हे गांभीर्य निर्माण झाले असतानाच पंतप्रधान मोदी यांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी रस्त्यावर येऊन टाळ्या वाजवत गर्दी केली. त्यांनी या प्रकाराला उत्सवाचे स्वरूप दिले. आणि त्यातील गांभीर्य पंतप्रधानांच्या आवाहनामुळे नाहीसे झाले. त्यानंतर मोदी आता लोकांना लॉकडाऊन गांभीर्याने घेण्याचे आवाहन आणि घरी बसून राहण्याची सूचना करीत आहेत.
करोनाच्या संबंधातील उपाययोजनासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्येही समन्वय किंवा तारतम्य नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सीमा सील केल्या आणि दिल्ली विमानतळही बंद राहील अशी घोषणा केल्यानंतर नागरी विमान वाहतूक खात्याने मात्र दिल्लीचे विमानतळ सुरूच राहील अशी घोषणा केली आहे. जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मध्येच विसंवाद असेल तर या रोगाला आळा घालता येणार नाही. दिल्लीच्या प्रख्यात एम्स रुग्णालयाने म्हटले आहे की आमच्याकडे करोनाला आळा घालण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. ही बाब केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी पुरेशा गांभीर्याने घेतली पाहिजे. कारण ही आरोग्य संस्था त्यांच्या अखत्यारीत आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.