ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह : परिसरात दुर्गंधी पसरली
चिंबळी (वार्ताहर) – कोट्यवधी उत्पन्न असलेल्या कुरूळी (ता. खेड) ग्रामपंचायतीला सांडपाण्याची मात्र विल्हेवाट लावता येत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कुरूळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मुऱ्हे वस्ती डोंगरे रस्त्यासावर गेल्या दोन महिन्यांपासून सांडपाणी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरात आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या सांडपण्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी वारंवार मागणी केली जात आहे. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून करोना व्हायरस संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनजागृती मोहीम सगळीकडे सुरू असूनही कुरूळी ग्रामपंचायत या सांडपाण्याची विल्हेवाट लावत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
मी सरपंच पदावर येण्याअगोदर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे सांडपाणी रस्त्यावर येत आहे, येथील आजूबाजूला असलेल्या जागा मालकाचा विरोध आहे. तरी यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.
-सचिन कड, सरपंच, कुरूळी.
चेंबरमध्ये रस्त्याच्याकडेचा मुरूम व गाळ तसेच माती अडकली असल्याने चेंबरमध्ये पाणी तुंबले आहे. काम रखडले आहे; परंतु येत्या दोन ते तीन दिवसांत या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मार्ग काढण्यात येईल.
-छाया इराणक,ग्रामविकास अधिकारी, कुरुळी