बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळासमीप गवते वस्ती येथे मंगळवारी मध्यरात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. यामध्ये इंडिगो कारमधील चौघांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात पळणारी इंडिगो कार रस्त्याच्याकडेला असलेल्या एका विद्युत ट्रान्सफॉर्मरला धडकली.
गणेश सिरसाठ, विजय नागरगोजे, गोविंद नागरगोजे, रिजवान आयुबखान पठाण अशी अपघतात ठार झालेल्यांची नावे आहेत. हे चौघेजण मंगळवारी रात्री कारने परळी येथून पाथर्डीकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
ही धडक इतकी जोरदार होती की, काही क्षणात ट्रान्सफॉर्मरचा खांब गाडीवर कोसळून कारचा चक्काचूर झाला. खांब गाडीवर पडल्याने त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या आवाजाने आजूबाजूच्या वस्तीतील लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली व गाडीत अडकलेल्या अन्य दोन जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले.
तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याकल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर हा भीषण अपघात झाला. हा महामार्ग बीड जिल्ह्यातून जातो.