जीएसटी वाढीवर मोबाइल उत्पादकांची टीका
पुणे – मोबाइल हॅन्डसेटवर 2017 पर्यंत केवळ 5 टक्के एवढा कर होता. मात्र आता हा कर तब्बल 18 टक्के झाला आहे. यामुळे मोबाइल सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर वाढल्यामुळे मोबाइलचे स्मगलिंग होऊन काळा बाजार वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा मोबाइल उत्पादकांनी दिला आहे.
मोबाइल उत्पादकांची संघटना असलेल्या आयसीइएचे अध्यक्ष पंकज महिंद्रू म्हणाले, मंदी आणि करोना विषाणू असतानाच जीएसटी परिषदेने मोबाइलवरील जीएसटी 18 टक्के केल्यामुळे सर्वसामान्य लोकांवर 15 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. याचा परिणाम 100 कोटी लोकांवर होणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे भारतात मोबाइल निर्मिती करण्याच्या प्रकल्पावर परिणाम होऊन बेकारी वाढू शकते.
2017 मध्ये मोबाइलवर केवळ 4 ते 5 टक्के मूल्यवर्धित कर होता आणि 1 टक्के उत्पादन शुल्क होते. नंतर यावर 12 टक्के जीएसटी लावला. आता तो 18 टक्के करण्यात आला आहे. याबाबत शिओमी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज जैन यांनी सांगितले की, यामुळे मोबाइल क्षेत्रातील मेक इन इंडियावर व डिजिटल इंडिया वरही परिणाम होऊ शकतो. मोबाइलद्वारा इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे सरकारने या विषयावर फेरविचार करण्याची गरज आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत भारतामध्ये 80 अब्ज डॉलरचे मोबाइल उत्पादनाचे उद्दिष्ट ठरविले आहे. मोबाइलवरील जास्त जीएसटीमुळे हे उद्दिष्ट साध्य करणे केवळ अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.