मुंबई : कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईमध्ये दोन जणांना कोरोनाचा विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
दुबईवरून आलेल्या पुण्याच्या दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्यांनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु होता. या रुग्णांसोबतचे मुंबईतील दोन प्रवाशांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईतील दोघांची तपासणी कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने केल्यानंतर या दोन रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 7 वर पोहचली आहे.
दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालयं तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी विमानतळांवर करण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे.
21 फेब्रुवारी नंतर या विदेशात जाऊन आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेण्यात येत आहे. तसेच इटली, इराण, आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे.
इतर राज्यातून जवळपास महाराष्ट्रात 635 प्रवासी आले आहेत. या सर्व प्रवाशाना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयातील विलगीकरण दाखल करण्यात आलं होतं.
आतापर्यंत 349 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 312 जणांची टेस्ट निगेटिव्ह आली असून 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.