स्वतःचं घर…! प्रत्येक माणसाचं एक स्वप्न. आपण कष्टाने कमावलेल्या आपल्या हक्काच्या घरात राहायला जाण्यासारखं दुसरा मोठा आनंद या जगात नसेल. नव्या घरात प्रवेश करताना घराच्या भिंतींवर गृहलक्ष्मीच्या कुंकवाच्या हातांचे ठसे लावले जातात. घरात सौख्य, शांती, आनंद, समाधान नांदावे, अशी मागणी वास्तुपुरुषाकडे करताना घरच्या भिंतींना जणू कुंकवाचा अभिषेकच गृहलक्ष्मी घालत असते. त्या नव्या भिंतींवरून घराच्या स्वामिनीचा मायेने भरलेला हात फिरताच जादूची कांडी फिरावी तसे घर आनंदाने उजळून निघते… कल्पना करा, जर त्या घराच्या भिंतींमधील विटाच एखाद्या गृहलक्ष्मीने बनवलेल्या असतील तर किती सौख्य, किती समाधान, किती आनंद त्या घरात नांदत असेल? किती भाग्याची असेल ती वास्तू? आणि किती भाग्यवंत असतील त्या घरातील माणसे? असे भाग्य खूप कमी नशिबवानांना लाभते… पुनावळेतील ओव्हाळ कुटुंबही असेच भाग्यवान… त्यांच्या घरातील लक्ष्मीचा हात केवळ घराच्या भिंतींवरूनच नाही फिरला, तर घर बांधण्यासाठी लागणाऱ्या विटा बनवताना त्या माऊलीच्या घामाच्या धारांचा अभिषेकही त्या विटांवर झाला… म्हणूनच कितीही संकटे कोसळली, अगदी बांधलेले घर जळाले तरी या कुटुंबाच्या घराचा पायाच मजबूत असल्यामुळे पुन्हा पुन्हा हे घर तितक्याच ताकदीने उभे राहिले… नांदते राहिले आणि प्रगतशील होत राहिले !
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक आणि उद्योजक शेखर ओव्हाळ यांच्या मातोश्री म्हणजे शशिकलाताई अशोक ओव्हाळ. घरात अठराविश्व दारिद्य्र असतानाही आल्या परिस्थितीचा सामना करीत, समाधानी वृत्तीने संसार करणाऱ्या शशिकलाताईंच्या माणुसकीच्या संस्कारामुळे आज त्यांची तीनही मुले चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी नावलौकीक मिळविला आहे. शशिकलाताईंनी खूप संघर्ष केला आहे. त्यांची कहाणी सर्वसामान्य महिलांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे.
शशिकला अशोक ओव्हाळ यांच्या संसाराची कथासुद्धा आशीच आहे. माहेरी अठराविश्व दारिद्य्र त्यात शिक्षण नाही. हुंडा कसा द्यायचा हा मोठा प्रश्न. मात्र, आशोक ओव्हाळ यांनी कूप्रथेला बगल देत हुंडा न घेता स्व:खर्चाचे शशिकला यांच्यासोबत लग्न करून साथीदार म्हणून निवडले. मग, शशिकला यांनी आपल्या पतीच्या प्रत्येक संघर्षात साथ देण्याचे मनात घट्ट ठरवले. सासरी दीड एकर जमीन तिला फक्त पावसाच्या पाण्यावर पिकवून पोट भरत नव्हतं, मग दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून उपजीविका भागत होती. मात्र, राहण्यासाठी घर असावं. मात्र, बांधण्यासाठी पैसा नाही. मग काय, स्वत: शशिकला यांनी नदीवरून पाणी आणून स्वत: विटा तयार करून या माऊलीने आपलं घर उभारलं आणि संसार उभा केला.
शशिकलाताईंचा जन्म 2 जून 1956 साली जांब या गावातील निकाळजे कुटुंबात झाला. पुनावळे येथील अशोक ओव्हाळ यांनी त्यांना मागणी घातली. माहेरची परिस्थिती बेताची असल्यामुळे हुंडा देऊ शकत नव्हते. त्यात शशिकलाताईंचे शिक्षणही झालेले नव्हते. मात्र, अशोक ओव्हाळ यांनी एक रुपयाही हुंडा न घेता स्वखर्चाने त्यांच्याशी लग्न केले. तेव्हाच शशिकलाताईंनी आपल्या या समजूतदार आणि मोठ्या मनाच्या जीवनसाथीला प्रत्येक संकटात साथ देऊन सुखी संसार करण्याचा निश्चय केला. माहेराप्रमाणे सासरची परिस्थितीही खूप चांगली अशी नव्हती. त्यामुळे कष्ट हे ठरलेलेच. त्यांचे यजमान अशोक ओव्हाळ म्हणजेच नाना हे त्याकाळी कंपनीत कामाला होते. त्यांच्या तुटपुंज्या पगारावर घरखर्च भागत नव्हता. सासरची दीड एकर जमीन होती. तिला फक्त पावसाच्या पाण्यावर पिकवून कुणाचच पोट भरत नव्हतं. मग शशिकलाताई दुसऱ्यांच्या शेतात राबायला जायच्या. कुठं कांदा लागवड, कुठं भात लागवड, वाफे धरणे, कापणी, खुरपणी अशी सगळी कामे त्या करीत. अगदी रात्री-बेरात्री पिकांना पाणी द्यायचे कामही त्यांनी केले. नानाही सुट्टी मिळाली की शेतातली कामे करीत. दरम्यान, या दाम्पत्याला शंभू, गणेश आणि शेखर अशी तीन अपत्ये झाली. परिस्थिती हालाखीची असल्यामुळे शेतात राबत, गुरे-ढोरे सांभाळीत या माऊलीने आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण दिले. मुलांना कसल्याही गोष्टींची कमतरता भासू नये म्हणून ओव्हाळ दाम्पत्य कष्ट उपसत होते. परिस्थिती कशीही असो, शशिकलाताई कधीच डगमगल्या नाहीत. त्यांनी आपल्या पतीला नेहमीच खंबीर साथ दिली.
एकदा शशिकलाताई शेतात काम करीत होत्या. त्यावेळी एका विषारी सर्पाचा त्यांना दंश झाला. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांना वेळीच उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचला. मुले मोठी होत असताना ओव्हाळ दाम्पत्याने स्वतःच घर बांधायचं ठरवलं. पैशांची कमतरता असल्यामुळे त्यांनी स्वतःच बांधकाम करायला सुरुवात केली. घरच्या घरी माती कालवून वीट बनवणं सुरू केले. नाना कामावरून आले की विटा बनवायला माती कालवित. कष्टाचं काम होतं, पण समाधानही मोठं होतं. त्या विटांमध्ये शशिकलाताई आणि अशोकनाना यांच्या घामाच्या धारा मिसळल्यामुळे त्या आणखीनच मजबूत बनल्या. मात्र, काही काळाने त्यांच्या या घरावर अचानक मोठं संकट कोसळलं. काबाड कष्ट करून बांधलेल्या घराला ऐन दिवाळीच्या सणातच आग लागली. त्यावेळी शशिकलाताई या आपल्या मुलांना घेऊन नदीवर कपडे धुवायला गेल्या होत्या. त्याचवेळी अचानक घराला आग लागली होती. तेव्हा त्या मुलांसमवेत धावतच घराकडे निघाल्या.
तोपर्यंत शेजारपाजारच्या लोकांनी त्यांचे यजमान नाना यांना बोलावून आणले. आपल्या हाताने एक-एक वीट बनवून मोठ्या कष्टाने बांधलेले घर डोळ्यासमोर जळताना पाहून शशिकलाताईंना दुःख अनावर झाले, पण त्या खचल्या नाहीत. चिमणी काडी-काडी जमवित आपलं घरटं बांधते. कधी पाऊस तर कधी वादळवाऱ्याने तिने कष्ट घेऊन बांधलेलं घरटं मोडून पडतं. पण ती हिंमत हारत नाही. ती पुन्हा नव्या जोमाने काड्या जमवू लागते. हे लक्षात ठेवून शशिकलाताईंनी पुन्हा आपले घर सावरायला सुरुवात केली. त्या कटू आठवणी सांगताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते. इतक्या कष्टातून त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवत मोठे केले. मुलांनीही आपल्या मायमाऊलीच्या कष्टांची जाण ठेवली. त्यांची तीनही मुले आज आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झालेले आहेत. शंभू ओव्हाळ हे आज बॅंकिंग क्षेत्रात, गणेश ओव्हाळ बांधकाम व्यावसायिक तर, शेखर ओव्हाळ यांनी राजकारणाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शशिकलाताईंनी अत्यंत हालाखीचे दिवस काढले होते. आपल्यासारखे कष्ट कुणाच्या नशिबी येऊ नये, असे त्यांना मनोमन वाटते. त्यामुळेच आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांनी सामाजिक भान ठेवत गरजूंना मदत करण्याचे ठरविले आहे. गोर-गरिबांच्या मुलींच्या लग्नात काही अडथळा येऊ नये यासाठी महिला मंडळ स्थापन करून यासाठी निधी जमवून त्या आर्थिक मदत करतात. कुणी आजारी असेल तर त्यांना सगळ्या प्रकारची मदत त्या आवर्जून करतात. त्यांची हीच सेवावृत्ती त्यांच्या मुलांमध्येही उतरली असून ते देखील अडल्या-नडल्या लोकांना सढळ हाताने मदत करीत असतात.
शशिकलाताईंचे सर्वात लहान सुपुत्र शेखर ओव्हाळ यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकदा नगरसेवकपद भुषवले आहे. त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून दीन-दुबळ्या घटकांची सेवा करावी, असे त्यांना मनापासून वाटते. शेखर यांनी आमदार व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. राजकारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. त्यांच्या अडचणी समजून घेता येतात. म्हणूनच शेखर यांनी आमदार होऊन जास्तीत जास्त लोकांची सेवा करावी, असे शशिकलाताई म्हणाल्या. आज त्या आपल्या घरात तृप्त आहेत. त्यांच्या समाधानी चेहऱ्याकडे पाहून आपसूकच काही ओळी सुचतात…
संघर्षातही फुलविला संसार,
मोडले घर कैकदा, बांधले वारंवार…
बळ दिले नित्य लेकरांना,
कधी ना मानली हार !