प्रामाणिकपणे काम करण्याच्या सचोटीतून साध्या ग्रामसेविका पदापासून सहाय्यक गटविकास अधिकारी पदापर्यंतची मजल मारणाऱ्या उषा साळुंखे यांचा आयुष्यातील प्रवास थक्क करणारा आहे. मनाची जिद्द असेल तर माणूस मरणाच्या दारातूनही मागे येऊन यशस्वी होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण त्या आहेत. त्यांच्या कार्याविषयी…
कराड पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी पदाची धुरा समर्थपणे सांभाळत असणाऱ्या उषा साळुंखे यांचे माहेरचे नाव उषा निकम. पाटण तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे मल्हारपेठ हे त्यांचे जन्मगाव. वडिल रामचंद्र निकम एस. टी. महामंडळात ड्रायव्हर होते. तर आई गृहिणी त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्या काळात मुलींना फारसे शिक्षण दिले जात नव्हते. दहावीपर्यंतचे शिक्षण झाले की, लगेच लग्न केले जाई.
उषा यांना शिक्षणाची फार आवड होती. मात्र, वडिलांसमोर त्यांचे काही चालेना. दोन वर्षे घरी बसून काढली. सन 1981 मध्ये ग्रामसेविका पदाची जाहिरात निघाल्यानंतर घरच्यांना न सांगता या पदासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांची निवड झाली. परंतु ही नियुक्ती जावली तालुक्यात होती. त्यामुळे वडिलांचा प्रखर विरोध स्विकारत त्या पदावर हजर झाल्या. तेथे चार महिने काम केल्यानंतर त्यांनी पाटणला आपली बदली करून घेतली. तोपर्यंत कामाचा चांगला जम बसला होता आणि घरच्यांकडून पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे काम करायला आणखीनच मजा आली.
सन 1983 मध्ये त्यांचा विवाह वडगाव हवेली ता. कराड येथील जगन्नाथ गंगाराम साळुंखे यांच्याशी झाला.
त्यामुळे 1985 मध्ये त्यांनी कराड पंचायत समितीत आपली बदली करून घेतली. आपल्याला मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हेच त्यांच्या यशाचे खरे तत्त्व आहे. त्याच्या जोरावर त्यांनी 1991 मध्ये खटाव तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाअतंर्गत पर्यवेक्षिका म्हणून निवड झाली. तेथेही त्यांनी आपल्या पदाचा सर्वसामान्यांसाठी कसा उपयोग होईल याकडे जादा लक्ष दिले. तेथे 1998 पर्यंत त्यांनी काम केले. कोणत्याही कामाबाबत वेळकाढूपणा केला नाही. 1998 मध्ये पुन्हा त्यांची कराडमध्ये बदली झाली.
शासकीय सेवेत अधिकाऱ्यांच्या बदल्या हे ठरलेल्याच असतात. मात्र कोणत्याही गावात बदली झाली तरी नाराज न होता झोकून देऊन काम करणे हीच उषा साळुंखे यांच्या कामाची सचोटी म्हणावी लागेल. या काळात त्यांनी कुपोषण निर्मूलनांतर्गत मोठे काम केले. तसेच 15 ते 20 मुलांच्या हृदयांच्या शस्त्रक्रियेसाठी स्वत: प्रयत्न केले. स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांना नेहमीच मार्गदर्शन करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना सन 2001 मध्ये आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या वतीनेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
त्यांचे पती जगन्नाथ साळुंखे हेही ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत. परंतु आपली पत्नी एक-एक यशाचे टप्पे पार करत असताना तिच्याबद्दल कोणताही द्वेष वाटून न घेता. तिला नेहमीच पाठिंबा देण्याचे काम त्यांनी केले. कोणत्याही यशस्वी पुरूषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. परंतु उषा साळुंखे यांच्या यशाच्या पाठीमागे त्यांचे पती जगन्नाथ साळुंखे यांची मोलाची साथ आहे, असेच म्हणावे लागेल.
सर्वकाही सुरळीत चालू असताना त्यांच्या कुटूंबावर अचानक काळाचा घाला झाला. जी. बी. सिंड्रोम या आजाराने उषा साळुंखे यांना ग्रासले.
एक वर्ष त्या अंथरूणावर खिळून होत्या. इतके दिवस आजाराला झुंझ देत असताना त्या पुन्हा उठून उभ्या राहतील याबाबत अनेकांना साशंकता होती. मात्र, मनाची जिद्द असेल तर माणूस मरणाच्या वाटेवरूनही परत येऊ शकतो. हेच उषा यांनी सिद्ध करून दाखवले. अर्थात त्या एक वर्षाच्या कालावधीत त्यांच्या नोकरीस विरोध करणारे आई-वडिल, पती, दोन मुले यांनी मोलाची साथ दिली. एका लहान बाळाची जितकी काळजी घेतली जाते अगदी तशीच काळजी या सर्वांनी त्यांची घेतली. त्यांना मिळालेले जीवदान हे या सर्वांच्या सेवेचे श्रेय आहे असे त्या म्हणतात.
एक वर्षानंतर पुन्हा त्या कामावर रूजू झाल्या. सर्वांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. आज त्या कराड पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. हे पदही त्यांनी फक्त आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरच मिळवले आहे. सध्या संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षणचे वारे वाहत असले तरी त्याची खरी सुरूवात सन 2000 मध्येच झाली आहे. त्या काळात उषा साळुंखे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काम केले.
आजची परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती यात खूप फरक आहे. आज लोक सुशिक्षीत असल्याने लोकांना फारसे सांगावे लागत नाही. मात्र, त्याकाळी घरोघरी जाऊन लोकांना माहिती द्यावी लागत होती. त्यामुळे तळगाळापर्यंत जाऊन त्यांना काम करावे लागले. शासकीय क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी होत्या. मात्र लोक यायला तयार नव्हते. त्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. शासकीय नोकरी किती महत्त्वाची आहे, हेही पटवून द्यावे लागले. मात्र, आज अनेक अर्ज येऊन पडतात नोकरीचा थांगपत्ता कोणालाच नसतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर मिळेल ते काम प्रामाणिकपणे करा यश तुमचेच आहे, असा सल्ला त्या आजच्या पिढीला देतात.