नवी दिल्ली – लोकसभेचे कामकाज आज सलग पाचव्या दिवशी विरोधकांनी दिल्ली दंगलीच्या विषयावरून केलेल्या गदारोळामुळे विस्कळीत झाले. तथापी या गोंधळाच्या वातावरणातच दोन विधेयके कोणत्याही चर्चेविना संमत करून घेण्यात आली. यातील एक विधेयक खाण कायद्यातील दुरूस्तीचे आहे तर दुसरे विधेयक ईनसॉल्वन्सी अँड बॅंकरप्सी कोड मधील दुसऱ्या दुरूस्तीचे आहे.
आज सकाळी लोकसभेचे कामकाज अकरा वाजता सुरू झाल्यानंतर कॉंग्रेस, द्रमुक आणि मुस्लिम लीगच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनापुढील जागेत जमून दिल्ली दंगलींवर चर्चा करा आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी अनेक सदस्यांनी आपल्या दंडावर काळ्या फिती लावल्या होत्या. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपल्या दंडाला काळी फित लावली होती. तेही या निदर्शनात सहभागी झाले होते.
कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी हे लोकसभा कामकाजाच्या नियमावलीचे पुस्तक घेऊन यावेळी सभापतींशी वाद घालताना दिसून आले. सदस्यांनी एखाद्या महत्वाच्या विषयावर सभागृहात चर्चेची मागणी केल्यानंतर त्याला अनुमती देणे बंधनकारक असल्याचे ते या नियमावलीच्या पुस्तकाद्वारे समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
यावेळी सभापचींच्या आसनावर किर्ती सोलंकी हे होते. त्यांनी या गदारोळामुळे सुरूवातीला दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकुब केले. त्यानंतर त्यांनी ही तहकुबी दुपारी बारा पर्यंत केली. बाराला कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळाची स्थिती कायम राहील. त्या वातावरणातच सरकारने दोन विधेयकांचे प्रस्ताव सादर केले आणि ते चर्चेविनाच मंजुर करण्यात आले. त्यानंतर सभापतींनी 12.45 पर्यंत कामकाज तहकुब केले. पण तरीही हा गोंधळ सुरूच राहिल्याने हे कामकाज 11 मार्च पर्यंत तहकुब करण्यात आले.