उत्तम पिंगळे
रविवारी सकाळी जरा निवांत वेळ असल्यामुळे बाजारहाट झाल्यावर विसरभोळे सरांकडे गेलो. सद्यपरिस्थितीवर विचारविनिमय चालू असतानाच सरांनी अचानक विषय इतिहासाकडे वळवला. नव्या सरकारने रायगडाच्या डागडुजीसाठी 20 कोटींची तरतूद केल्याचे सरांनी सांगितले. सर सांगत होते की महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची अगदी वाईट अवस्था आहे. मग ते म्हणाले की, मी नुकताच राजस्थान दौरा केला. तेथे किल्ले खूप चांगल्या अवस्थेत आहेत. प्रत्येक ठिकाणी तिकीट आहे; पण त्याप्रमाणे तेथे जतनही केलेले आहे. बहुतेक किल्ल्यांमध्ये संग्रहालय असून त्या वेळची शस्त्रे, पोषाख, खेळ, शिकार व कलाकुसर यांचे दर्शन होत असते. जोधपूरच्या मेहरानगढ किल्ल्यावर तर वरती जाण्यासाठी लिफ्ट आहे. लिफ्टने थेट वरती जाऊन येताना हळूहळू किल्ला बघणे शक्य होते. एवढेच काय येथे उद्ध्वस्त गाव व स्मशान यांच्यासाठीही तिकीट आहे, हे ऐकताच मी उडालोच. उद्ध्वस्त गाव काय पहायचे, असे मी म्हणालो.
मग सर सांगू लागले की, जैसलमेर जिल्ह्यात एक कुलधरा म्हणून गाव आहे. आम्ही तेथे गेलो होतो. आता गावात कुणी राहात नाही व त्याविषयी अनेक आख्यायिका आहेत. तेराव्या शतकातील ही गोष्ट आहे. कुलधरा हे ब्राह्मणांचे गाव होते. राजस्थानच्या पालीहून तेथे स्थलांतरित झालेल्या ब्राह्मणांनी नंतर पालिवाल हे नाव धारण केले. नंतर त्यांनी आजूबाजूला छोटी-छोटी 84 गावे वसविली. एकोणिसाव्या शतकात जैसलमेरच्या राजाचा प्रधान सलीम सिंग यांच्या डोळ्यात एक ब्राह्मणाची मुलगी भरली व त्याने तिथे जाऊन त्या मुलीची मागणी केली. त्या कुटुंबीयांनी नकार दिला कारण ते पूर्ण शाकाहारी होते. सलीम सिंगने त्यांना एका दिवसाचा अवधी दिला. नाहीतर जबरदस्तीने लग्न करण्यात येईल असे सांगितले. त्याच रात्री मग त्या सर्व गावच्या पालिवाल लोकांनी गाव सोडून देशात स्थलांतर केले. पण जाताना त्यांनी शाप दिला.
आम्हास हे गाव सोडून जावे लागले तर आता हे गाव पुन्हा कधीच असणार नाही. तुमच्या परिचयाचा कुणी पालिवाला असेल तर त्यांना विचारा. दुसऱ्या दिवशी सलीम सिंगचे सैनिक येऊन पाहतात तर गावात कुणीच नाही. मग काही ठिकाणी त्यांनी घरांची तोडफोड केली. ही घटना सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची. तेव्हापासून हे गाव पुन्हा कधीच वसले नाही. सर्वत्र पडझड झालेली घरे; पण आता राजस्थान सरकारने गेली पाच-सहा वर्षांपासून हालचाल केली आहे व समोरच्या घरांची पुन्हा दुरुस्ती सुरू केली आहे. म्हणजे त्या वेळी ती घरे कशी होती हे लोकांना समजावे.
आता हे गाव पर्यटनाच्या नकाशावर आहे. सध्या समोरच्या अगदी सहा-सात घरांचे काम सुरू आहे; पण बाकी सर्व भग्न घरे आहेत. आपल्या सरकारनेही अशा या वास्तूंची डागडुजी करून त्या जतन कराव्यात. हवं तर तिकीट ठेवा की ज्यामुळे ते सांभाळण्याचा थोडाफार खर्च तरी निघेल. दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे महाराजांची छत्री. वेगवेगळ्या संस्थानांचे महाराज व त्यांचे वारस यांचे ज्या ठिकाणी दहन होते तेथे नंतर चबुतरा बांधण्यात येतो त्याला छत्री म्हणतात.म्हणजे एका परीने स्मशानच. कारण अशा अनेक छत्र्या आजूबाजूला दिसत असतात. आता तर तेथे अनेक चित्रपटांचे शूटिंगही होते. तेथे अगदी महाल, राजवाडेपासून भग्न गाव ते स्मशानालाही तिकीट आहे; पण त्या वास्तूंचे जतनही केले जात आहे. आपल्या सरकारनेही आपला जुना वारसा जतन करणे आवश्यक आहे. जेणेकरून नवीन पिढीला आपला इतिहास समजेल.