नवी दिल्ली – हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्ली क्षेत्रातल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
या भागात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. येत्या 7 तारखेपर्यंत परीक्षेला उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पून्हा वेगळ्या तारखेला परीक्षा घेण्याची तयारी केल्याचेही मंडळाने जाहीर केले आहे. अशा विद्यार्थ्यांची यादी पुरवण्याचे आदेशही मंडळाने शाळांचे मुख्याध्यापक आणि दिल्लीच्या शिक्षण संचालनालयाला दिले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला येणे शक्य होणार नाही, त्यांनीदेखील शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा आणि शाळेने त्याबाबतचा अहवाल द्यावा, असे आवाहनही मंडळाने केले आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षा आणखी पुढे ढकलल्या तर पुढच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होतील, असेही मंडळाने म्हटले आहे.
या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात यासाठी ईशान्य दिल्ली क्षेत्रातल्या परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करावे यासाठी मंडळाने दिल्ली पोलीस आयुक्तांना लेखी निवेदनही दिले आहे.