पुणे : राजकारण हे देशात बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे. त्यामुळे तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून भारताला वृद्धिंगत करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या वतीने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित 10व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी केरळ विधानसभेचे अध्यक्ष पी.श्रीरामकृष्णन, लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील, नोबल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरु डॉ. एन. टी. राव, विद्यार्थी प्रतिनिधी हिमांशू चौधरी, शिवानी ब्रिदवाडे, मंजीत जंग्गीद आणि सय्यद झकेरिया अहमद हे उपस्थित होते.
यावेळी केरळ विधानसभेचे अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन यांना “आदर्श विधानसभा सभापती’ पुरस्काराने गौरविन्यात आले.
व्यंकय्या नायडू म्हणाले, राजकारण केवळ निवडणुका लढवत नाही तर तो सार्वजनिक जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आपण देशाच्या कार्यात रूची घेतो आणि राजकारण हे आपल्या देशात बदल घडवून आणण्याचे कार्य करीत आहे. भारतात सामाजिक सुधारणा भारतीयांनीच आणली आहे.