शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध
मंचर- सत्तेवर आलेल्या शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरिल अत्याचार वाढले आहेत. शेतकरी कर्जमाफीचा डंका पिटून प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात हातखंडा असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. 25) घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
घोडेगाव तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनप्रसंगी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, तालुका भाजपाचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, माजी अध्यक्ष संजय थोरात, विजय पवार, भानुदास काळे, कैलास राजगुरव, भगवान ढुमणे गुरुजी, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, गणेश बाणखेले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती; पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही, असा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे यांनी केला.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत, असा आरोप यावेळी माजी अध्यक्ष संजय थोरात यांनी केला. महिलांवरिल अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करीत आहे. असे यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी सांगितले.