अलिगढ – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली अलिगढ जिल्हाधिकारी कार्यालयावर आज काढलेला मोर्चा पोलीस आणि रॅपीड ऍक्शन फोर्सच्या जवनांनी अर्ध्या रस्त्यातच आडवला. जुन्या अलिगढ शहरातून निघालेला हा मोर्चा कालपुतळा पूलाजवळ आल्यावर आडवण्यात आला. या मोर्च्यामध्ये महिलांचा समावेश मोठ्या संख्येने होता. या मोर्च्याच्या पार्श्वभुमीवर पोलीस आणि शीघ्र कृती दलाने शहरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.
पोलीसांच्या मोठ्या फौजफाट्याने मोर्चा अडवल्यावर मोर्चेकऱ्यांनी मार्ग बदलून ते इदगाह पर्यंत पोहोचले. “सीएए’विरोधात गेल्या तीन आठवड्यांपासून अलिगढमध्ये आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्या ठिकाणी मोर्चा पोहोचू शकला नही. या मोर्च्याच्या पार्श्वभुमीवर कोतवालीजवळच्या काही भागातील दुकाने बंद करण्यात आली होती. नियमभंग करून मोर्चा काढण्यात आल्यामुळे दिल्ली गेट पोलीस ठाण्यात तीन जणांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल “एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे, असे नुकतेच जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेले अलीगडचे एसएसपी राजमुनी यांनी सांगितले.
आंदोलकांशी चर्चेचा मार्ग खुला आहे. मात्र कोणालाही कायदा आणि सुव्यवस्थ बिघडवू दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.