50 हजार कोटींची गुंतवणूक, 80 हजार जणांना रोजगार
मुंबई: डेटा सेंटर क्षेत्रामध्ये येत्या तीन ते चार वर्षांत सुमारे 40 ते 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच, यातून सुमारे 80 हजार जणांना नोकरीची संधी मिळणार आहे. डेटा सेंटर प्रकल्पांमुळे महाराष्ट्र जगाचे डेटा कॅपिटल होण्याची संधी निर्माण झाली आहे.
डेटा सेंटर प्रकल्पासंदर्भात राज्यातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपनींच्या सीईओंनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची नुकतीच भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भविष्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डेटा सेंटरची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. महाराष्ट्रात मुंबई परिसरात डेटा सेंटरसाठी पोषक वातावरण आहे. या क्षेत्राच्या वाढीसाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीसाठी उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उर्जा विभागाचे सचिव असिम गुप्ता, स्टर्लिन अँड विल्सन कंपनीचे सीईओ प्रसन्न सरबंले, सुमीत मुखीजा, राजेश तापडिया, मनोज पौल, नरेंद्र सेने, शरद संघी, सुजित देशपांडे, वीपिन शिरसाठ, सुराजीत चटर्जी आदी उपस्थित होते.
डेटा सेंटर या क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी शासनाने जमीन, वीज व इतर सुविधा व सवलती देण्यासाठी धोरणांत बदल करण्याच्या सूचन यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, मुंबई तसेच किनारपट्टीलगत डेटा सेंटर स्थापन्यासाठी राज्य शासनाचे धोरण आहे. याद्वारे महाराष्ट्र ग्लोबल डेटा कॅपिटल म्हणून पुढे येईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
उद्योगांना स्वस्त दरात वीज
राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून याविषयी चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उर्जा व उद्योग विभागाच्या सचिवांची बैठक घेण्यात आली. गुजरात व कर्नाटक राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगांना 25 ते 35 टक्के अधिक दराने वीज पुरवठा केला जात आहे. हे दर कमी करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. दरम्यान, इतर राज्यातील वीज दरांतील तफावत, महाराष्ट्रात वीज पुरवठ्यातील त्रुटी, तांत्रिक अडचणी काय आहेत, आदी बाबींचा सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश देसाई यांनी दिले.