मुंबई: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावरवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पठाण यांना माध्यामांशी बोलण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, औरंगाबादचे खासदार खासदार इम्तियाज जलील यांनी वारीस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितले. वारिस पठाण यांनी विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करणारं वादग्रस्त वक्तव्य एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तो पर्यंत वारिस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
वारिस पठाण यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारिस पठाण यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास वारिस पठाण यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मी जे काही म्हटलेय ते संविधानाच्या मर्यादेतच राहून बोललो असल्याचं स्पष्टीकरण वारिस पठाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलं.मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. अशी टीप्पणीही त्यांनी केली आहे.