अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘या’ मुद्द्यांवरून तापणार वातावरण
मुंबई – येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या नावाखाली सत्ता स्थापन केली असून यामुळं शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला भाजपवर विरोधकांच्या बाकावर बसण्याची वेळ आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजप राज्यातील शेतकरी समस्या, महिलांवरील अत्याचाराच्या घटना व एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएला सोपवल्यावरून महाविकास आघाडीतील मतभेद या मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सामान्यतः ६ आठवडे चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा ४ आठवडे चालणार असून २० मार्च रोजी अधिवेशनाची सांगता होणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे सरकार ६ मार्च रोजी आपला पहिलावहिला अर्थसंकल्प सादर करणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेटपूर्व बैठकांचा धडाका सुरु केला आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी, शेतकरी कर्जमाफी, मागील काही दिवसांमधील महिला अत्याचाराच्या घटना यांसारख्या मुद्द्यांचा वापर करू शकतात.
उदयनराजे भाजपात आले आणि पडले, त्यांचं योगदान काय?- संजय काकडे