केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती
नवी दिल्ली – ब्रिटन मधील संसदेच्या खासदार डेबी अब्राहम यांना भारताने काल दिल्ली विमानतळावरूनच बाहेर घालवून दिले आहे. त्यावरून सध्या मोठे वादंग सुरू आहे. त्या संबंधात केंद्र सरकारच्या सूत्रांनी आज सांगितले की अब्राहम या ई बिझनेस व्हिसाच्या आधारे भारतात आल्या होत्या पण त्यांच्या भारत विरोधी कृत्यामुळे त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आणि ही बाब त्यांना 14 फेब्रुवारी रोजीच कळवण्यात आली होती.
कोणत्याही नागरीकाला व्हिसा जारी करणे किंवा तो रद्द करणे हे पुर्णपणे एखाद्या सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. हा एखाद्या देशाचा सार्वभौम अधिकार आहे. त्यामुळे त्या आधारावर भारत सरकारने त्यांचा व्हिसा नाकारला आहे असेही या सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान अब्राहम यांना गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला ई बिझनेस व्हिसा देण्यात आला होता व त्या व्हिसाची मुदत 5 ऑक्टोबर 2020 पर्यंत होती.
पण त्यांनी भारत विरोधी भूमिका घेतल्याने देश हितासाठी त्यांना भारतात येण्यासाठी मनाई करण्यात आली आणि त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. ही बाब 14 फेब्रुवारी रोजीच त्यांना कळवण्यात आली असताना तरीही त्या भारतात आल्याने त्यांना येथून परत पाठवण्यात आल्याचा खुलासा सरकारी सूत्रांनी केला आहे. डेबी अब्राहम या ब्रिटनच्या खासदारांचा काश्मीर विषयी जो गट स्थापन करण्यात आला आहे त्याच्या अध्यक्षा आहेत. त्यांना सोमवारी दिल्ली विमानतळावरूनच बाहेर घालवून देण्यात आले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्याला विमानतळावर एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक दिली असा त्यांचा आरोप आहे.