दौंड लोहमार्ग पोलिसांनी तातडीने 13 जणांना केली अटक
दौंड – मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांच्या टोळक्याने कल्याणमधील एका कुटुंबाला मारहाण केल्याने या मारहाणीत 26 वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या डब्यातच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 12) रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे.
सागर जनार्धन मारकड (वय 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर ताईबाई मारुती पवार, रूपाली सोमनाथ चव्हाण, आदेश शिवाजी चव्हाण, गणेश शिवाजी चव्हाण (चौघे रा. मांडगाव ता. बार्शी जि. सोलापूर), जमुना दत्ता काळे, निकिता अशोक काळे, अशोक आप्पा काळे (तिघे रा. भूम, जि. उस्मानाबाद), ताई हनुमंत पवार, कलावती धोंडिबा चव्हाण (तिघे रा. कळमवाडी, ता. बार्शी), गंगुबाई नामदेव काळे (रा. शेलगाव ता. बार्शी जि. सोलापूर), सोमनाथ शिवाजी चव्हाण (रा. देगाव ता. बार्शी जि. सोलापूर), सोनू आप्पा काळे (रा. सिंगोली जि. उस्मानाबाद), गणपत पवार (रा. कळमवाडी ता. बार्शी जि. सोलापूर) यांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सागर यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहती अशी की, पुणे रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म नंबर सहावरून मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेस गाडीच्या इंजिनचे मागील दुसऱ्या क्रमांकाच्या जनरल डब्यातून पुणे ते कुर्डुवाडी असे प्रवासाला सागर, त्यांची लहान मुलगी, आई व बायको सोबत निघाला होता. जनरल डब्यात बसण्यास जागा नसल्याने सागर मारकड आणि त्याच्या सर्व कुटूंब उभे होते गाडी पुणे रेल्वे स्टेशनपासून सुटताच सागर यांनी दरवाजा लगत असलेल्या सीटवरील एका महिलेस म्हणाले की, माझ्या पत्नी जवळ लहान मुलगी आहे बसण्यासाठी थोडी जागा द्या, तेव्हा त्या महिलेने सागर यांना शिवीगाळ केली.
तेव्हा सागर यांनी त्या महिलेस शिवीगाळ करू नका असे म्हणत असल्यावर तिथे असलेल्या एका गटातील महिलांनी सागर यांना आणखीन शिवीगाळ करून धक्काबुक्की करू लागले व त्या महिलेसोबत असलेले सहा पुरुष, आणि सहा महिला यांनी देखील सागरसह कुटुंबीयांना मारहाण केली. त्या दरम्यान सागर हा मारहाणीमुळे डब्यातच खाली पडला. त्याला सागरला दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण मारहाणीमुळे जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास दौंड लोहमार्ग पोलीस करीत आहेत.