दोन जमीन मालकांमध्ये हद्दीचा वाद; रहदारीचा रस्ता रखडला
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या तोंडावर ग्रामस्थांमध्ये संताप
शाळकरी मुले, नोकरदार सहन करताहेत त्रास
देहूगाव – जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा अवघ्या महिन्यावर (11 मार्च) येऊन ठेपला आहे. बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूकर समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. देहू ग्रामपंचायतीकडून विकासकामांचा घोडदौड सुरू असतानाच दोघांमधील हद्दीच्या वाद झाला. या वादातून कापूर ओढ्याजवळील मंगल कार्यालय ते सुतार आळी दरम्यान रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाला “ब्रेक’ लागला. ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या मनधरणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने रस्त्याचे काम रखडले स्पष्ट झाले आहे. आता सोहळ्याच्या तोंडावर वाद मिटण्याचे शक्यता धूसर दिसतेय. त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांना मनस्ताप सहन करावा लागणार यात शंका नाही.
तीर्थक्षेत्र देहूगाव येथील कापूर ओढ्याजवळील रिंगरोड लगतच मंगल कार्यालय ते सुतार आळी दरम्यान रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण काम हद्दीच्या वादात अडकले आहे. दोघांमधील हद्दीच्या वादाने काम पूर्णपणे थांबले आहे. हद्द दाखवित एका शेतकऱ्याने तर चर खोदला आहे. तर दुसऱ्याने कंपाऊडसाठी लोखंडी खांब उभारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना रहदारीसाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे.
श्री क्षेत्र देहूगाव येथील नवीन वार्ड क्रमांक दोनमधील मंगल कार्यालय ते सुतार आळी दरम्यानचा 321 मीटर लांब व 12 फूट रुंदी रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण कामासाठी ग्रामनिधीतून 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे काम ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहे. साडेतीन मीटरचा असणारा रस्ता तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत साडेसात मीटरचा करण्यात येणार होता; मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे रस्त्याला “खो’ बसला.
याशिवाय भूमिगत मलनि:स्सारण वाहिन्यांमुळे खराब झालेल्या रस्त्याने नागरिकांना पायी चालणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामनिधीतून 25 लाख रुपये खर्चून 12 फूट रुंद आणि 321 मीटर लांबीचा सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचा ठेका चार महिन्यांपूर्वी देण्यात आला होता. या रस्त्याचे 60 टक्के अटोपले आहे. तसेच सुमारे 200 मीटर लांबीचा दुतर्फा काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र सध्या जमिनीला असलेला सोन्याचा भावामुळे हा रस्ता मोजणी व हद्दीच्या वादाने रोखला गेला आहे. या रस्त्यावर एकाने जमिनीच्या हद्दीवर कंपाऊंडसाठी लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. हे खांब प्रस्तावित रस्त्यामध्ये आले आहेत. तर दुसऱ्याने रस्त्यावरच चर खोदत हद्द दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.
एकीकडे मोजणीसह हद्दीचा नकाशा उपलब्ध असून, त्यांनी त्यानुसार कंपाऊंडसाठी खांब उभे केले आहेत. तर दुसऱ्याकडे हद्दीबाबत नक्की खुलासा होत नसल्याने पूर्वीच्या रस्त्याप्रमाणेच रस्ता करण्यात यावा, या भूमिकेमुळे रस्त्याच्या कामाला “ब्रेक’ लागला आहे. या रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत दोघा जमीन मालकांशी चर्चा केली. मात्र असूनही हा प्रश्न सुटला नसल्याने रस्त्याचे काम पूर्णत: रखडले आहे.
या रहदारीच्या रस्त्यालगत खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा, मोठ्या प्रमाणात वसाहत आणि गृहप्रकल्पे आहेत. येथील रहिवाशांना ये-जाणे अवघड झाले आहेत. रहदारीचा रस्ता अचानक बंद झाल्याने वाहने दूरवर उभी करावी लागते, त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमन सोहळा म्हणजेच बीज सोहळा 11 मार्च रोजी आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. सध्या या रस्त्याचा वाद आणि हद्द निश्चित होईपर्यंत रस्त्याचे काम होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
पूर्वीपासून असलेल्या जुन्या रस्त्याप्रमाणे कामास प्रारंभ करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी कामास अडथळाही नव्हता. उद्भवलेला वाद मिटवण्यासाठी दोघांच्याही कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन लवकरच रस्ता पूर्ण करण्यात येईल.
– अर्जुन गुडसूरकर, ग्राम विकास अधिकारी, देहू.